। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज पहाटे एका खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असला, तरी अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे 29 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ‘साईराम ट्रॅव्हल्स’च्या बसला भीषण अपघात झाला. माळीवाडा टोलनाक्यापासून काही अंतरावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या बसने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर काही वेळातच बसने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. बसमध्ये 29 प्रवासी, दोन चालक आणि एक कंडक्टर असे एकूण 32 जण होते. या घटनेची माहिती मिळताच पदमपुरा आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्राच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की बसचा सांगाडा उरला आहे. सुदैवाने, अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने 30 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या भीषण आगीत खामगाव येथील रहिवासी अमोल सुरेश शेलकर (38) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा आणि चालकाची झोप या कारणांमुळे वारंवार अपघात होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. माळीवाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






