रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम आठवड्यात जाहीर होणार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत हालचालींना वेग आला असून, राज्य निवडणूक आयोगाकडून या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात असून संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली आहे. आरक्षण व कायदेशीर बाबींवर अंतिम स्पष्टता मिळाल्यानंतर तारखा, नामांकन, छाननी आणि मतदानाचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांनीही तयारीला गती दिली आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वाढल्याने प्रशासकांची राजवट संपून लोकशाही पुन्हा कार्यरत होणार अशी चिन्हे स्पष्ट होत आहेत. अनेक महिन्यांपासून प्रशासकांच्या हातात असलेली सत्ता आता थेट जनतेच्या हाती जाणार असल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका 31 जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार, आता यामध्ये मुदतवाढ करण्यात आली असून, 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला आहे. यापुर्वीच पहिल्या टप्प्यात रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक होणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. कार्यक्रम जाहीर होताच रायगड जिल्ह्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून निधी वितरण, उद्घाटन कार्यक्रमांवर मर्यादा येणार आहेत.
मागील काही महिन्यांपुर्वी लोकसंख्या वाढ विचारात घेऊन प्रभाग रचना करण्यास सांगितले होते. परंतु, 2021 मध्ये जनगणना न झाल्याने ती प्रभाग रचना रद्द करून 2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांमध्ये आरक्षण आहे. तर, इतर 20 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे त्याविषयी काय निर्णय होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणूका जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता होती. परंतु, महानगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे या निवडणूका लांबणीवर गेल्या. त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेण्यासाठी मूदतवाढ देण्यात आली. सोमवारी (दि.12) झालेल्या सुनावणीत 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूका पुर्ण करण्याचे आदेश सवोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुका शासन कधी घेणार, याकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे डोळे लागून राहिले आहेत. अखेर ही उत्कंठा आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आठवड्याभरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रदिर्घ कालावधीनंतर रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते बैठकीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कामाला लागले आहेत.
रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण
रायगड जिल्हा परिषदेवर यापुर्वी शेतकरी कामगार पक्ष 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 11, काँग्रेस व भाजप प्रत्येकी 3 असे बलाबल होते. रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांचा कार्यकाळ 22 मार्च 2022 रोजी संपला. आता कार्यकाळ संपून 3 वर्षे 9 महिने होऊनदेखील जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. तेव्हापासून रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडले असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती अध्यक्ष व सदस्यपदांचे आरक्षणही जाहीर झाले आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
जिल्हा परिषदेच्या 59 तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी आरक्षण, मतदान यादी, मतदार केंद्र निश्चित झाले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 17 लाख 381 मतदार आहेत. त्यात 8 लाख 57 हजार 9 महिला मतदार, 8 लाख 46 हजार 347 पुरुष मतदार अणि 25 इतर मतदारांचा समावेश आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 2 हजार 323 मतदान केंद्र उपलब्ध आहेत. या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पुर्ण झाली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आले आहे. आता निवडणुका जाहिर होण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
निवडणूक गाजणार
जिल्ह्यातील स्टोन क्रशर, अवैध वाळू उपसा, रोजगार, पर्यटन विकास, आदिवासी भागातील मूलभूत सुविधा, रोजगार, पाणी पुरवठा, रस्ते, भुमीपूजनांचा देखावा, भ्रष्टाचार आदी विविध मुद्दे निवडणुकीत केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षांसह स्थानिक आघाड्यांनीही कंबर कसली असून रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे.







