| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी दिवसभर उत्साहात मतदान झाले. मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यात मतदार सकाळपासूनच मतदानासाठी बाहेर पडले होते. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावला, तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या झेन झी मतदारांनीही उत्साहात मतदान केले. मात्र, मुंबईसह महत्त्वाच्या शहरात मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 41.08 टक्के मतदान झाले. राज्यात 9 वर्षानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदानासाठी यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून आलं.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डांमध्ये निवडणुका पार पडल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्ड आहेत, तर सर्व महानगरपालिकांमध्ये एकूण 893 वॉर्ड आहेत. अशा प्रकारे, राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2869 जागा आहेत, ज्यासाठी 15908 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
तणावपूर्ण वातावरणात मतदान पूर्ण
मतदानाच्या दिवशी लोकशाहीची खुलेआम थट्टा झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. काही मतदान केंद्रांवर उघडपणे पैशांचे वाटप झाल्याच्या तक्रारी असून महायुतीकडून मतदारांना प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. त्याचवेळी अनेक ठिकाणी मतदान यंत्रे वारंवार बंद पडल्याने तासन्तास मतदान खोळंबले असल्याचे समोर आले. यातच बोगस मतदार मतदानासाठी आल्याचे प्रकार उघडकीस आले असून विरोध झाल्यावर काही केंद्रांवर हातघाई व मारामारीचे प्रसंग घडले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असतानाही पोलिस व निवडणूक यंत्रणेने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या साऱ्या गोंधळामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आज निकाल जाहीर होणार असला, तरी त्याआधीच या निवडणुकीवर वादाचे सावट गडद झाले आहे.
ग्रामीण भागात उत्साह
सकाळी साडेसातपासून सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेला पालिकेत समाविष्ठ ग्रामीण भागातील मतदारांनी सकाळपासूनच उत्साहात प्रतिसाद दिला. ग्रामीण भागाचा सहभाग असलेल्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये सर्वाधिक मतदान झाले. तर सुरवातीला मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या शहरी भागातील मतदारसंघात दुपारनंतर मतदान वाढले. मतदान प्रक्रिया बंद होण्याच्या काही मिनटे आधी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचा दावा मतदान प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या मुद्द्याने कामोठे परिसरात चर्चा निर्माण झाली होती. कामोठे येथील बूथ क्रमांक 13 आणि केंद्र क्रमांक 3 मधील इंगे-स्कॉट शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावून बाहेर आलेल्या सुनील शिरीषकर यांनी मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई साध्या पाण्याने व टिशू पेपरने पुसली जात असल्याचा दावा केला. त्यांनी यासंदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे राज्यातील इतर महापालिकेमध्ये दिवसभर चर्चेला आलेला हा विषय पनवेलमध्ये देखील चर्चेला आल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 7 मध्ये देखील असाच आरोप करत मनसेचे उमेदवार शिवम पाटील आणि वंचितच्या उमेदवार प्रियंका गाडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मतदान यंत्र बंद
प्रभाग क्रमांक 8 मधील एका मतदान केंद्रातील एक मतदान यंत्र बंद पडल्याने मतदान काही वेळ ठप्प झालं होत. प्रशासनाकडून दखल घेत ठप्प झालेले मतदान पुन्हा सुरु करण्यात आले.
मयत व्यक्तीच्या नावे मतदान झाल्याचा दावा
प्रभाग क्रमांक दहामधील एका मतदान केंद्रावर मयत व्यक्तीच्या नावे मतदान करण्यात आल्याचा दावा प्रभाग 10 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले उमेदवार अक्षय हाके यांनी केला आहे. तसेच अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा हाके यांचा आरोप आहे.
उमेदवाराच्या पोलिंग बूथवर गर्दी
मतदानापूर्वी आपले नाव मतदार यादीत आहे का, हे तपासण्याकरता मतदारांनी उमेदवारांच्या बूथवर मोठी गर्दी केल्याने अनेक भागातील उमेदवारांची जनसंपर्क कार्यालय बंद करण्याची वेळ पोलिसांवर आली.
मतदान केंद्राच्या नावामुळे मतदारांची धावपळ
बहुतांश उमेदवारांकडून मतदारांना त्यांच्या नावाच्या तसेच नाव त्या केंद्रावर आले आहे त्या केंद्राच्या नावाच्या पावत्या पुरवण्यात आल्या. मात्र या याद्या इंग्रजी अक्षरात असल्याने तसेच प्रभाग क्रमांक दहामधील एका मतदान केंद्राचे नाव इंग्रजीमध्ये वेगळ्याच अर्थाने छापण्यात आल्याने हे केंद्र कुठे आहे, हे शोधण्यासाठी मतदारांना धावपळ करावी लागली. या प्रभागातून मनसेकडून उमेदवारी करत असलेल्या प्रीती चव्हाण यांना देखील केंद्राची शोधाशोध करावी लागल्याचे पाहायला मिळाले.
मतदान यंत्र उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप
प्रभाग क्रमांक एकमधील डान्सर गावातील मतदान केंद्रावर मतदान यंत्र उलट्या क्रमाने लावण्यात आल्याचा आरोप करत आघाडीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने या केंद्रावरील मतदान काही वेळ ठप्प झाले होते. त्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजप महायुतीच्या उमेदवारांनी मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी ओळखपत्र घातले नसल्याने तसेच अधिकाऱ्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे न सांगितल्याने गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. यामुळे झोनल ऑफिसर यांनी मतदान केंद्राला भेट देत आपला आक्षेप लेखी देण्याची मागणी करत नंतर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.






