93 पैकी 52 सीसीटीव्ही बंद असल्याचे उघड
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या श्रीवर्धन शहरात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला असून, सामान्य जनता दहशतीखाली वावरत आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेली तीसरी आंख म्हणजेच सीसीटीव्ही यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचे समोर आले आहे. शहरातील एकूण 93 कॅमेऱ्यांपैकी तब्बल 52 कॅमेरे धूळखात पडून असल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांनी श्रीवर्धनमध्ये धाव घेत आक्रमक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडीच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. मात्र, जेव्हा पोलीस तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहायला गेले, तेव्हा बहुतांश ठिकाणचे कॅमेरे बंद असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, ज्या भागात चोऱ्या झाल्या, त्याच भागातील कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद होते. यामुळे पोलिसांना तपासात मोठे अडथळे येत आहेत.
केवळ चोऱ्याच नव्हे, तर रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून घरांच्या दरवाजावर टकटक करणे, छतावर दगडफेक करणे आणि डोंगरदऱ्यांच्या दिशेने पळून जाणे असे संशयास्पद प्रकार वाढले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, महिला आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, सीसीटीव्हीची देखभाल ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. यंत्रणा असूनही ती कार्यान्वित का नाही? असा सवाल आता विचारला जात आहे. यावेळी नगरसेवकांनी लेखी निवेदन देऊन तपासाची मागणी केली असून, नगराध्यक्षांनी कॅमेरे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
शहरातील सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, गुन्हेगारांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे.
– अभिजित शिवतारे, अप्पर पोलीस अधीक्षक






