तहसीलदारांचे कारवाईकडे दुर्लक्षचा आरोप
| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुड-जंजिरा तालुक्यातील उसडी येथे बेकायदेशीर स्टोन क्रशर आणि दगड खाण प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनाने यापूर्वी कोट्यवधींची कारवाई करूनही पुन्हा उत्खनन सुरू झाल्याने महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, प्रशासनाविरोधात उघड नाराजी व्यक्त होत आहे. तहसीलदारांकडे तक्रार करुनही राजकीय वरदहस्तामुळे कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दगड खाणीमुळे केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर या खाणीपासून काहीच अंतरावर असलेल्या चिचघर धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला असून, धरणाला काही धोका झाल्यास उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईचा गंभीर फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय ही खाण महामार्गालगत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.

दरम्यान, बेकायदेशीर उत्खननावर कारवाई होत नसल्यामुळे महसूल विभागाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवासी महेश जानू ठाकूर (रा. मिठागर, पो. सावली, ता. मुरुड-जंजिरा) यांनी 1 एप्रिल 2026 रोजी तहसीलदारांकडे याबाबत सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मौजे उसडी येथील गट क्रमांक 170, क्षेत्र 0-50-90 हेक्टर या मिळकतीवर अस्लम इस्माईल कादरी (रा. दत्तवाडी, मुरुड) यांच्या नावावर सातबारा असून, कोणतीही शासकीय परवानगी न घेता येथे बेकायदेशीर दगड उत्खनन व स्टोन क्रशर सुरू आहे. महेश ठाकूर यांनी यापूर्वीही तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. उलट, राजकीय दबावामुळे खाणमालकावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, याच प्रकरणात प्रशासनाने पूर्वी कारवाई करत सुमारे 65 ते 66 लाखांचा दंड ठोठावला होता, तसेच अंदाजे तीन कोटींची वाहने जप्त केली होती. याशिवाय, सरकारी गुरचरण जमिनीवरील अनधिकृत उत्खननप्रकरणी पोलिसांत गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच पुन्हा उत्खनन सुरू झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधितांनी दंडाची रक्कम न भरता आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पुन्हा काम सुरू केल्यामुळे चिचघर, आगरदांडा आणि उसडी परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पर्यावरणीय हानीबरोबरच शेतीचेही नुकसान वाढले आहे.
महेश ठाकूर यांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत, तातडीने कारवाई न झाल्यास उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच, अस्लम इस्माईल कादरी यांच्या मिळकतीवरील स्टोन क्रशरची तात्काळ पाहणी करून ते बंद करण्यात यावे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या तक्रारीची प्रत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्हाधिकारी, रायगड (खनिकर्म) यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे. या प्रकरणामुळे उसडी, सावली, आगरदांडा व परिसरातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून, बेकायदेशीर खाणींमुळे होणाऱ्या पर्यावरणीय व आर्थिक नुकसानीविरोधात पुन्हा आवाज उठू लागला आहे. आता महसूल प्रशासन प्रत्यक्षात कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिचघर धरणाला वाढता धोका
उसडी येथील बेकायदेशीर स्टोन क्रशर आणि दगड खाणीच्या अगदी वरच्या बाजूस असलेल्या चिचघर धरणाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या धरणातून राजपुरी, आगरदांडा, मिठागर, उसडी, खामदा, सावली, टोकेखार आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, स्टोन क्रशरमुळे होणाऱ्या सततच्या हादऱ्यांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. जर ऐन उन्हाळ्यात धरणाला काही अपघात झाला, तर अनेक गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळू शकते, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. तरीही प्रशासन या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
उसडी येथील बेकायदेशीर स्टोन क्रशर आणि दगड खाणीविरोधात वारंवार तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करत आहे. आता मी कोकण आयुक्तांकडे तक्रार करणार असून, न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषण करणार आहे.
महेश ठाकूर,
तक्रारदार






