नागरिकांकडून तीव्र संताप
| चिरनेर | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील पळस्पे-डेरवली-कोन मार्गावर मोठ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघातांतदेखील वाढ होत आहे. या वाढत्या अपघातांच्या मालिकेमुळे स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी व वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. “अजून किती जणांचा जीव घेणार?“ असा संतप्त सवाल डेरवलीकरांसह अनेक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पळस्पे-डेरवली-कोन या मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे दररोज धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. दिवसा अवजड वाहने एकाच लेनमधून नियंत्रित पद्धतीने चालविणे बंधनकारक करावे, तसेच या मार्गावर तातडीने 30 किमी प्रतितास वेगमर्यादा लागू करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप युवा तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृत युवकाचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पळस्पे-कोन मार्गावरील वाहतूक कोंडी, अपुरी पर्यायी व्यवस्था आणि नियोजनातील त्रुटी यामुळे अनेक वेळा जीवितहानीचे प्रसंग उद्भवत आहेत. वाहतूक नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा विविध उपाययोजना करत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव साबीर शेख यांनी या पार्श्वभूमीवर “शून्य अपघात अभियान” राबविण्याची मागणी केली आहे. विकासकामे पूर्ण होऊन उड्डाणपूल तयार होईपर्यंत या मार्गावर 24 तास वाहतूक नियंत्रण, सुरक्षा कर्मचारी, दिशा दर्शक, चेतावणी फलक, प्रकाशयोजना आणि अवजड वाहनांचे नियमन प्रभावीपणे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच पळस्पे-कोन मार्गावर रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थ व पत्रकार साबीर शेख यांनी दिला आहे.
तसेच, विकासकामे सुरू असताना रस्ते सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे ही संबंधित कंत्राटदार, विकासक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे सांगत, भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित कंत्राटदार, विकासक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्ते सुरक्षा नियम धाब्यावर
रस्ते सुरक्षा नियम धाब्यावर बसवून कररूपाने कोट्यवधी रुपये भरणाऱ्या वाहन चालक, प्रवासी, स्थानिक नागरिकांचा जीव मात्र रस्त्यावर टांगणीला लागल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित रस्ते सुरक्षा यंत्रणा, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विकासकांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक अपघाताची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी त्यांच्यावरच राहील, असा इशारावजा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.







