| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वेलवली खानाव ते खानाव या रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडामध्ये पडून वेलवली खानाव येथील एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.7) रात्रीच्या सुमारास घडली असून गावामध्ये शोककळा पसरली आहे. चांगू कमळू घरत असे या मृत पादचाऱ्याचे नाव असून ते वेलवली खानाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेने परिसरात बांधकाम विभागाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्या इसमाचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात बाजूच्या शेतामध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. भगदाड पडलेल्या ठिकाणी प्रशासनाने सुचना फलकासह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाय योजना न केल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. बांधकाम अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.







