कर्जत, खोपोलीतून तीन संशयित ताब्यात; पाकिस्तानस्थित शाजाद भट्टीच्या सोशल मीडियावर तरुणांचा संपर्क
| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तान आणि दुबईतून भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या शाजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि आयएसआयच्या हस्तकाच्या संशयास्पद जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानस्थित कथित आयएसआय हँडलर शाजाद भट्टीच्या दहशतवादी-गुन्हेगारी सिंडिकेटच्या सोशल मीडियाबरोबर संपर्क झालेल्या तीन भारतीय तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. या तीन तरुणांना रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोलीतून ताब्यात घेतले असून, सुरक्षा यंत्रणांनी त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.
एटीएसमधील अधिकृत सूत्रांनी ‘कृषीवल’शी बोलताना या कारवाईला दुजोरा दिला. रायगड आणि नवी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या तीन संशयित तरुणांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. त्या तरुणांच्या संपर्कात असणाऱ्या सर्वांची चौकशी आणि करडी नजर सुरक्षा यंत्रणांनी ठेवली आहे. एटीएसने केलेल्या या कारवाईमुळे रायगड जिल्हा पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.
शहजाद भट्टीची टोळी इंटरनेटवरील इन्स्टाग्राम सारख्या समाजमाध्यमांवरून संशयितांचा शोध घेते. त्यांना स्वतः संदेश पाठवते. त्यानंतर विश्वास बसताच त्यांना छोटे-छोटे टास्क दिले जातात. या बदल्यात काही रक्कम ही टोळी ऑनलाईन माध्यमातून देते.शाजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानी गँगस्टर असून, तो सध्या दुबईतून आयएसआयच्या इशाऱ्यावर फुट सोल्जर मिशन चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. भारतातील तरुण पिढीला लक्ष्य करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भडकावणे, देशात स्लीपर सेल्स तयार करणे आणि मोठ्या शहरांमध्ये घातपात घडवून आणणे हा त्याचा मुख्य हेतू आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच दिल्ली आणि पंजाबमध्ये भट्टीच्या सहा हस्तकांना अटक करून पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा मोठा कट उधळला होता. या आरोपींच्या चौकशीतूनच त्याचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. या ताज्या कारवाईत एटीएस प्रामुख्याने एका वेगळ्या अंगाने तपास करत आहे. हे संशयित तरुण शाजाद भट्टीच्या थेट संपर्कात कसे आले, त्यांनी भट्टीने तयार केलेल्या चिथावणीखोर रील्स सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या का किंवा त्याला फक्त लाईक केले होते का, याचा तांत्रिक तपास केला जात आहे.
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या व्यक्ती एटीएसच्या निशाण्यावर आहेत. संबंधित संशयित व्यक्तींचे मोबाईल फोन, लॅपटॉप्स, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची कसून तपासणी केली जात आहे. या कारवाईत अद्याप कोणालाही अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नाही. मात्र चौकशीतून मिळणाऱ्या माहितीच्या आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एटीएस सूत्रांनी सांगितले आहे.
पाकिस्तानमध्ये बसलेला शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांशी संपर्क साधत होता. तो या तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी प्रवृत्त करत असल्याचा तीव्र संशय तपास यंत्रणांना आहे. याच अनुषंगाने त्याच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी आणि त्यांचा हेतू याची पडताळणी एटीएस करत आहे.
भट्टीचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी कथित संबंध असल्याचा आरोप आहे. यामुळेच तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. सोशल मीडियाद्वारे भारतातील तरुणांशी संपर्क साधून त्यांना दहशतवादी कारवाया, हेरगिरी आणि टार्गेट किलिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी वापरले जात असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आता त्याच्या या कथित नेटवर्कचा तपास केला जात आहे.
तरुणांनो, आमिषाला भुलू नका!
पाकिस्तानातून विविध व्हॉट्सॲप ग्रुप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला आर्थिक लाभ, ऑनलाइन कामे, परदेशातील संधी किंवा अन्य आकर्षक आमिषे दाखवून तरुणांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर त्यांना टप्प्या-टप्प्याने देशविरोधी आणि बेकायदेशीर कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय तपास यंत्रणांच्या प्राथमिक तपासातून व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्ती, संशयास्पद व्हॉट्सॲप ग्रुप किंवा आर्थिक आमिषांना कोणत्याही परिस्थितीत बळी पडू नये. संशयास्पद संदेश, लिंक किंवा ऑफर मिळाल्यास त्याची तातडीने संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहन तपास यंत्रणांनी केले आहे.
तीन संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या डिजिटल उपकरणांची आणि सोशल मीडिया व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत अधिक माहिती देणे उचित ठरणार नाही. उपलब्ध पुरावे आणि चौकशीच्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
एटीएस







