हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती; उद्धव-राज यांचे सरकारवर टीकास्त्र
| मुंबई | प्रतिनिधी |
नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली, मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात तब्बल 26 दिवस पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वणव्यानंतर अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला. तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय मिळाला. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रविवारी (दि. 26) अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले होते. वंदे मातरम्.. भारत माता की जय… छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी, जय शिवाजी… अशा गगनभेदी घोषणा देत शिवतीर्थावर चोहोबाजूने तरुणाईचा महापूर लोटला होता. हातात तिरंगा, सरकारविरोधातील पोस्टर घेऊन हजारोंच्या संख्येने जमलेल्या तरुणाईने यावेळी विजयाचा जल्लोष साजरा केला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली. या जल्लोष सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, खा. अनिल देसाई, आ. अंबादास दानवे, आ. महेश सावंत, आ. मिलिंद नार्वेकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनसेचे अमित ठाकरे, शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष ॲड. साम्या कोरडे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारचा निषेधाच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी राज ठाकरे यांनी आत्महत्या केलेल्या सर्व 21 विद्यार्थ्यांची नावे घेत त्यांना आदरांजली वाहिली. तर उद्धव ठाकरे यांनी, हा लढा देशभक्त विरुद्ध अंधभक्त असा होता आणि आपण तो जिंकला, असे विधान केले.
सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम् हे गीत लावण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तिरंगा फडकवत विजयाचा जल्लोष साजरा केला.
दिल्लीत महिनाभरापासून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही 20 दिवस उपोषण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करत ताब्यात घेतले. या घटनेनंतर विद्यार्थी अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी ‘चलो संसद’ मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. अखेर या आंदोलनाचा परिणाम म्हणून केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.
अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले!
अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले आहेत. आता भाजप विरुद्ध भारत अशा संघर्षाची सुरुवात झालीय, असा एल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, एका झुरळाने हुकुमशहाला नमवलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. मला मोदीजींना सांगायचे आहे की, आतातरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना सांगा की, आता देशाचं काम करा. अर्थमंत्री निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल, महागाईबद्दल बोलत नाही; पण पेपरफुटीचे फायदे समजावून सांगतायत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देशाच्या संरक्षणाची बोंब पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलतायत. मोदींना मला सांगायचं आहे की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या त्याहून कितीतरी जास्त यातना आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना झाल्या आहेत. त्या यातना आम्ही विसरणार नाहीत. ही ठिणगी आता पडली आहे. देशभर वणवा पेटलाय, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मोदींनी पाहिलंय आता की, मत चोरी करता येते; पण माणसं चोरी करता येत नाही. मनं चोरता येत नाही. ही मनं आता पेटलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणं आपल्या सर्वांचं काम आहे. आता भोंदूत्व स्वीकारणारे अंधभक्त मुलांना धमक्या देतायत. त्यांचे व्हिडीओ काढा आणि पोस्ट करा. जिथे सापडतील त्यांना राष्ट्रभक्ती शिकवा, असेही उद्धव ठाकरे यांनी तरुणांना सांगितले आहे.
तरुणांनी देशाच्या इतिहासातलं सुवर्ण पान लिहलं आहे. तुमच्या शक्तीची एकजुटीची नोंद देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाल्याशिवाय राहणार नाही. पण, आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका. सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका. देशाची शक्ती काय असते ते दाखवून दिलेल्या देशाला पुन्हा कुणाला कमजोर करू देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी तरुणांना केले.
तरुणांच्या ताकदीने सरकारच्या झिंज्या उपटल्या!
नीट पेपरफुटीविरोधात तरुणांनी देशभर पेटवलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. या लढ्याने तरुणांची ताकद काय असते, हे केंद्र सरकारला दाखवून दिले. ‘जेन झी' सरकारच्या झिंज्या कशा उपटतात, हे या आंदोलनातून देशाला कळले. सत्तेच्या जोरावर तरुणांचा आवाज दाबता येत नाही, हे विद्यार्थ्यांनी आपल्या लढ्याने सिद्ध केले आहे. महिनाभर रस्त्यावर उतरून, लाठ्याकाठ्या सहन करूनही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या या तरुणांच्या संघर्षाचा हा विजय आहे. या विजयाचा उत्साह साजरा करण्यासाठी आज हजारो तरुण शिवाजी पार्कवर एकत्र आले आहेत. हा केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा विजय नाही, तर अन्यायाविरोधात उभ्या राहिलेल्या तरुणाईच्या जिद्दीचा आणि लढवय्या वृत्तीचा विजय आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला.







