केल्टेतील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांचा गंभीर आरोप
नोटिसा, हद्द कायम आणि अभिलेखांबाबत चौकशीची मागणी
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील केल्टे गावातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमिनींच्या मोजणी व हद्द कायम प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांना कायद्यानुसार पूर्वसूचना न देता मोजणी करण्यात आली, काहींना मोजणी पूर्ण झाल्यानंतर नोटिसा देण्यात आल्या, तर चुकीचे मोबाईल क्रमांक अभिलेखात नोंदविल्यामुळे संबंधितांना प्रक्रियेची माहितीच मिळाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत केल्टे ग्रामस्थांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, स्थानिक आमदार आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह महसूल सचिव, जिल्हाधिकारी आणि रायगड पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे.
शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत हद्द कायम?
काही शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना माहिती किंवा आपली बाजू मांडण्याची संधी न देता जमिनींची हद्द कायम करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच हद्द कायम करण्याच्या आदेशांवरील स्वाक्षऱ्या, शिक्के आणि प्रमाणीकरणाबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित कागदपत्रांच्या प्रतीही निवेदनासोबत जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेतील मोजणी नोंदी, नोटिसा, आदेश आणि महसूल अभिलेखांची स्वतंत्र तपासणी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित जमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
‘गरीब शेतकरी विरुद्ध पैसेवाल्यांचे त्रिकूट’
केल्टेतील मागासवर्गीय आणि इतर समाजातील गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीर व बोगस कागदपत्रांच्या आधारे, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता खरेदी-विक्री केल्या जात असल्याचा आमचा आरोप आहे. खोत, परप्रांतीय गुजराती-मारवाडी आणि दलालांचे त्रिकूट विरुद्ध गरीब शेतकरी अशी ही लढाई आहे. मात्र, ही लढाई आम्ही संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने लढणार, असा इशारा स्थानिक शेतकरी देवेंद्र मेढेकर यांनी दिला.आता या गंभीर आरोपांची प्रशासनाकडून कितपत दखल घेतली जाते आणि चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे केल्टेतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






