ओबीसी जागांसाठी 79 अर्ज होणार रद्द
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ओबीसी जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या असून रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमधील 21 जागांच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. या 21 जागांसाठी एकूण 79 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र ते अर्ज आता रद्द होणार असल्याने या जागांसाठी लढण्यास इच्छुक असणार्या उमेदवारांच्या इच्छेवर पाणी फेरले आहे. दरम्यान 6 नगरपंचायतींसाठी होणार्या ओबीसी जागा वगळता 81 जागांसाठी 360 अर्ज दाखल झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील पाली, तळा, म्हसळा, पोलादपूर, माणगाव आणि खालापूर या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. सहा नगरपंचायतींमधील प्रत्येकी 17 सदस्यांप्रमाणे 102 सदस्यांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. उमेदवारी अर्ज दाखला करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पालीमध्ये 90, तळा 77, म्हसळा 48, पोलादपूर 72, माणगाव 62 आणि खालापूर येथे 90 असे एकूण 439 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यात तळा आणि पाली नगरपंचायतीमधील ओबीसींसाठी आरक्षित प्रत्येकी चार जागांसाठी प्रत्येकी 19, पोलादपूर आणि माणगाव प्रत्येकी चार जागांसाठी प्रत्येकी 14, म्हसळा चार जागांसाठी 8 आणि खालापूर येथे एक जागेसाठी पाच असे एकूण 79 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या ओबीसींसाठी आरक्षित एकूण 21 पैकी दहा जागा या महिलांसाठी आरक्षित होत्या. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाच्या स्थगिती दिली. त्यामुळे ओबीसी जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तर नागरीकांच्या मागास प्रवर्ग व्यतिरिक्त अन्य जागांची निवडणुका नियोजित कार्यक्रमानुसार होणार आहे.
रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतींमधील ओबीसींच्या 21 जागांसाठी एकूण 79 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र निवडणूक रद्द झाल्याने या सर्वांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छेवर पाणी फिरले आहे. आता या सहा नगरपंचायतींमधील 81 जागांसाठी निवडणूक होईल.
या नगरपंचयत निवडणुकांसाठी 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली. या नामनिर्देशन पत्रांची छाननी 8 डिसेंबर रोजी झाली. तर मतदान 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.