आफ्रिकेला 113 धावांनी चारली धूळ
। सेंच्युरियन । वृत्तसंस्था ।
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 113 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवशी भारताने दक्षिण अफ्रिकेचे 6 गडी झटपट बाद केले. दुसर्या डावात जसप्रीत बुमराहने 3, मोहम्मद शमीने 3, मोहम्मद सिराजने 2 आणि आर. अश्विनने 2 गडी बाद केले. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा डीन एल्गर आणि टेम्बा बावुमा जोडी मैदानात जमली होती. मात्र एल्गर 77 धावांवर असताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डिकॉक जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. क्विंटन डिकॉक 21 धावा करून तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याचा त्रिफळा उडवला. वियान मल्डर क्विंटन पाठोपाठ बाद झाला. मल्डरने 3 चेंडूत अवघी एक धाव केली. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. लगेचच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मार्को जॅनसेन 13 धावा करून तंबूत परतला. ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कागिसो रबाडाला आपलं खातंही खोलता आलं नाही. अवघ्या 4 धावा करून आर. अश्विनच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लुंगी एनगिडी दुसर्या चेंडूवर बाद झाला आणि भारताला विजय मिळाला.
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारताना सर्वबाद 327 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेनं 197 धावा केल्या. त्यामुळे भारताला 130 धावांची आघाडी मिळी. दुसर्या डावात भारताने सर्वबाद 174 धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 304 धावांचं आव्हान दिलं. मात्र दक्षिण अफ्रिकेचा संघ सर्वबाद 191 धावा करू शकला.