। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील बागायतदार शेतकर्याचे प्रमुख उत्पादनाचे पिक असलेल्या सुपारी रोपांवर गेल्या काही महिन्यांपासून करपासदृश्य रोग पडल्याचे दिसून येत आहे. बागायतीतील अनेक एक ते दोन वर्षांच्या रोपांची मधली कोवळी पाने ही करपल्यासारखी दिसत असून रोपे वाळल्यासारखी दिसत आहेत. सध्या मुरुडमध्ये वातावरणाचा पारा हा भर दुपारी 38 अंशावर जात असल्याने उष्णतेचे तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण खूपच वाढले आहे. सततचे ढगाळ वातावरण, थंडीची कमतरता, विहिरीतील पाण्यातील क्षाराचे वाढते प्रमाण यामुळे येथिल नारळ सुपारीचे पिक धोक्यात आले आहे.
हवेतील उष्णता वाढल्याने नारळ व सुपारीच्या झाडांना लागलेल्या छोट्या छोट्या फळांचीही गळ सुरु झाली आहे. निसर्ग,तोक्ते वादळात येथील बागायतीतील नारळ सुपारीची बाजती झाडे जमिनदोस्त झाल्याने बागायतदारांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई करताकरता बागायतदारांच्या नाकी नऊ आले असतांना उजाड बागायतीत नव्याने लागवड करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुपारीची रोपेच करपू लागली आहेत. त्यामुळे दुष्काळात हा तेरावा महिनाच असल्याची प्रतिक्रिया येथिल बागायतदार व्यक्त करीत आहेत. बदलत्या हवामानाचा फटका आता या पिकांना बसत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी अधिकार्यानी या रोगाची पाहणी करुन कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांना त्यावरील उपाय शोधावेत अशी मागणी येथिल बागायतदारांनी केली आहे.