15 शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान, प्रशासनाचे दुर्लक्ष
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील वळवली येथील दहा एकरहून अधिक जागेत असलेल्या आंब्याच्या बागेला अचानक लागलेल्या आगीमुळे वळवली गावातील 10 ते 15 शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे होरपळलेल्या आंब्यांना पुन्हा फळ येण्याची शक्यता नसल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, तीन दिवस झाले तरी या नुकसानाकडे पाहायला महसूल विभागाला वेळच मिळाला नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
बेलोशी, वळवली परिसरात माळरानावर वळवली गावातील 10 ते 15 शेतकर्यांच्या आंब्याच्या बागा आहेत. या बागांवर येथील शेतकर्यांचा उदरनिर्वाह होता. मात्र, शनिवारी अचानक या माळरानावर लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीमुळे सर्वच्या सर्व 10 एकराहून अधिक जागेतील आंब्याची झाडे होरपळून गेली आहेत. त्यामुळे ही झाडे नापिक होण्याची भीती असल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भात तलाठी यांना फोन केला असता त्यांनी आपण रजेवर असून, चार्ज रामराज तलाठी यांच्याकडे दिला असल्याचे सांगितले. तर, रामराज तलाठी यांना संपर्क साधला असता त्यांनी आपल्याकडे अजून चार्ज दिला नसल्याचे सांगितले. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. दोन दिवस होऊनदेखील अजूनही पंचनामादेखील झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.