। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर नगरपंचायत हद्दीत असणारे क्रांतीनगर आणि रोहिदास नगर येथील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल झाले आहेत. येथील विहिरींची दुरावस्था झाली असून नगरपंचायत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समोर आले आहे.
शुद्ध पाणी पिण्याकरिता आणि कोणतीही रोगराई निर्माण होऊ नये याकरिता विहिरींची साफसफाई वेळोवेळी करणे फार महत्त्वाचे आहे. म्हणून विहीरीची साफसफाई, आणि स्वच्छता करून द्यावी याकरिता 22 एप्रिल 2022 रोजी क्रांतीनगर आणि रोहिदास नगर मधील ग्रामस्थांच्या सहीचे अर्ज प्रशासनाला देण्यात आले होते. परंतू आजपर्यंत प्रशासनाकडून त्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.
याकडे प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. तसेच विहिरीच्या बाजूने जाणारा खालापूरमधील लेंडी नाला याचा प्रवाह थांबल्यामुळे त्याचे देखील दूषित पाणी तेथेच तुंबून राहिल्याने त्यामध्ये विविध प्रकारच्या जलपर्णी, विविध प्रकारचा कचरा आणि घाण साचल्यामुळे तेच दुर्गंधी युक्त दूषित पाणी झर्या मार्फत विहिरीमध्ये गेल्याने ते पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे आणि हेच विहिरीचे पाणी लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्धांपर्यंत प्यायले जाते. असे दूषित पाणी पिणे म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे या भयाण परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क न मिळाल्यास नगरपंचायत प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा तीव्र भावना ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.