। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली परिसरात असलेल्या गॅस शवदाहिनी वरील पत्रे जीर्ण झाले आहेत, ते पत्रे पावसाळ्यापूर्वी बदलले नाही तर शवदाहिनी मशीनवर पाणी पडून शवदाहिनी बंद पडण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे नगरपरिषदेने शवदाहिनी वरील जीर्ण झालेले पत्रे त्वरित बदलावे अशी मागणी होत आहे.
नगरपरिषद क्षेत्रात येणार्या मुद्रे, गुंडगे,भिसेगाव, कर्जत, दहिवली अशा अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहेत, मात्र या ठिकाणी स्मशानभूमीत लाकडांचा वापर करून अंत्यविधी केले जातात सध्या लाकडांची कमतरता पाहता अंत्यविधीसाठी लाकडे उपलब्ध होत नाही, हे ओळखून नगर परिषद व मुंबई मेट्रोपोलिटन रिजनचे इन्व्हायरमेंट इम्प्रुमेंट सोसायटी मार्फत गॅसवर आधारित शवदाहिनीचे भूमिपूजन 20 जानेवारी 2011 रोजी करण्यात आले होते, दोन वर्षाच्या कालावधी नंतर दहिवली येथील गॅसवर आधारित शवदाहिनीचे काम पूर्ण झाले आणि 3 मार्च 2013 रोजी गॅसवर आधारित असलेली शवदाहिनी लोकार्पण करण्यात आली.
लाकडांची कमतरता भासत असल्याने दहिवली येथील गॅसवर आधारित असलेल्या शवदाहिनीकडे अंत्यविधी करण्याचा कल वाढला, मात्र या स्मशानभूमीतील शववाहिनीची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. शवदाहिनी मशीन असलेल्या शेडचे पत्रे नऊ वर्षांमध्ये जीर्ण झाले आहेत ते या पावसाळ्यापूर्वी बदलणे गरजेचे आहे, अन्यथा जीर्ण झालेल्या पत्रातून पाणी पडून शवदाहिनी मशीन बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पावसाळ्यापूर्वीच शवदाहिनीच्या शेडवरील जीर्ण झालेले पत्रे बदलणे गरजेचे आहे.