। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वहारा जन आंदोलनच्या पुढाकाराने पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सदर बैठक आयोजित करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्या प्रयत्नातून ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
महसूल, विकास यंत्रणेसह वन विभाग, पाटबंधारे विभाग, पोलीस, आदिवासी विकास, कामगार विभाग, महिला व बाल विकास, कौशल्य विकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग इत्यादी खात्यातील प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. धोरणात्मक व स्थानिक प्रश्नावर काय करायला हवे, विशेषतः आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा व आखणी करण्यात आली.
या बैठकीत झालेल्या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी पुढील पंधरवड्यात अशीच बैठक घेण्यात येईल असे ठरले. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून आदिवासी बांधव व कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.