। राजेश डांगळे । पनवेल ।
पावसाची चाहूल लागताच तिबोटी खंड्याचे कर्नाळा अभयारण्यात आगमन झाले आहे. साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई आणि आसपासच्या हरितक्षेत्रात आकर्षक अशा तिबोटी खंड्या पक्ष्यांच्या आगमनाला सुरूवात होते. कर्नाळा अभयारण्य या पक्ष्याचे नंदनवन आहे. याठिकाणी हे पक्षी दरवर्षी काही संख्येने प्रजननाकरिता दाखल होतात. कर्नाळा अभयारण्यात यंदाच्या हंगामातील पहिल्या तिबोटी खंड्याचे आगमन झाले.
तिबोटी खंड्या अर्थात ओरिएंटल द्वार्फ किंगफिशर. दरवर्षी मे महिना सुरू झाला की कोकण, रायगड विभागातील पक्षीप्रेमींना वेध लागतात ते याच तिबोटी खंड्याचे. खर हां पक्षी पावसाचे आगमन ची सुचना देण्याकरता येत असतो जैव विविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात हा खंड्या वर्षभर दिसतो. पण, कोकण आणि रायगड येथे हा साधारणपणे मे ते सप्टेंबर या कालावधीत दिसतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला हा पक्षी भूतान, श्रीलंका येथून 3 ते 4 महिन्यांसाठी स्थलांतरीत होतो. जुलै ते सप्टेंबर हा कालावधी या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. एखाद्या ओहळात किंवा ओहळाशेजारी मातीत बीळ करून हे पक्षी घरटे करतात. पाली, सापसुरळी, छोटे खेकडे, कोळी,बेडूक इत्यादी त्यांचे आवडीचे खाद्य. जिथे वाहते पाणी आणि भुसभुशीत जमीन असेल, तिथे एक मीटर लांबीचे घरटे तयार करून त्यामध्ये ऐका विणीच्या मोसमात तीन ते चार अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यावर वीस दिवसांनी घरट्याबाहेर येतात.
दरवर्षी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मे ते सप्टेंबर या कालावधीत या पक्ष्यांच्या पाच-पाच, सहा-सहा जोड्या विणी करता येत असतात. रायगड जिल्ह्याने मागील वर्षी रायगडमधील राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले होते. पिल्ले घरट्यातून बाहेर आली की पिल्लांपाठोपाठ त्यांचे पालकसुद्धा घरटे सोडून निघून जातात. अतिशय देखण्या दिसणार्या या पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी पक्षी निरीक्षक जातातच. पण, हल्ली त्यामुळे या पक्ष्याचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणूनच दोन वर्षांपूर्वी कर्नाळा पक्षी अभयारण्यात विणीच्या हंगामात या पक्ष्यांच्या फोटोग्राफीवर बंदी घातली होती.