। मुंबई । वार्ताहर ।
गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच चालले आहे. कोरोनाच्या या वाढत्या रुग्ण परिस्थितीवर राज्यातील शाळा सुरू होणार की पुन्हा बंद होणार का? शाळा बंद झाल्यात तर विद्दयार्थ्यांचं शिक्षण कसं होणार? याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांना प्रश्न पडले आहेत. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, शाळा 13 जूनपासूनच सुरु होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसात मुंबईत लक्षणीय वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचं आवाहन पुन्हा केलं आहे. राज्यात सध्यातरी मास्क सक्ती करण्यात आलेली नसली, तर सगळ्यांनी खबरदारी बाळगावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्यात येत्या 13 जूनपासून शाळा सुरु होणार असून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी नवी नियमावली जारी करण्यात येणार आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनाचे सर्व नियम पाळूनच घेण्यास सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी शाळेत विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे.
-शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड







