दीड लाख उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट
| उरण | वार्ताहर |
उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरणातील पाण्याने तळ गाठल्याने काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे याआधीच पाणीटंचाईची झळ सोसणार्या दीड लाख उरणकरांना पाणीटंचाईचे संकट सहन करावे लागण्याची शक्यत आहे. कारण, रात्रीपासूनच धरणातील डेड स्टॉकमधून पाणीपुरवठा करण्याची वेळ एमआयडीसीवर येऊन ठेपली आहे.
उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील रानसई एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील 37 ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यावर्षी रानसई धरणाची पाणीपातळी खालावल्याने उरणकरांना जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. त्यातच जूनचे 15 दिवस उलटून गेल्यानंतरही पाऊस बरसला नाही. त्यातच या धरणातील पाण्याचा जिवंत साठा बुधवारीच संपुष्टात आला आहे, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीकपातदेखील करण्यात आली असून, पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
धरणाच्या डेड स्टॉकमध्ये ही 30 जूनपर्यंतच पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे. याआधीच पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आठवड्यातील एका शुक्रवारी पाणीकपात केली आहे. मात्र, येत्या काही दिवसात रानसई धरण क्षेत्रात पाऊसच झाला नाही तर उरण परिसरातील नागरिकांना आणखी गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी वाया न घालवता पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन उरण एमआयडीसीचे उपअभियंता रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केले आहे.