पावसाच्या तडाख्यात पडले भगदाड
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
तालुक्यातील वडशेत वावे, साखरोणे, धारवली, आडी गावांना जोडणारा जावेळे येथील पुल कोसळल्याने दोन वर्षांपूर्वी सिमेंटचे पाईप व काँक्रिटीकरण करून बांधल्या गेलेल्या पर्यायी मार्गाला पावसाच्या तडाख्याने भगदाड पडले आहे. एस.टी.सेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. एक कोटी दहा लाखाचा नाबार्ड कडून मंजूर करण्यात आलेला रा.मा.99 मार्गावरील प्र.जि.मा.4 साखळी क्र.2/400 मधील जावेळे पुलाच्या कामाला मुहूर्त कधी लागणार ह्याची प्रतीक्षा ग्रामस्थांना लागली आहे.
श्रीवर्धन आगारातून आडी गावाकडे मार्गस्थ होणार्या गाड्या ह्या पर्यायी मार्ग नादुरुस्त झाल्यामुळे बागमांडला,कोलमांडला मार्गे साखरोणे, धारवली,वडशेत वावे येथे जात असल्याने हा प्रवास साधारण दिड ते दोन तासाने वाढत असुन श्रीवर्धन येथे येणार्या कॉलेज व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.खाजगी वाहने व रिक्षाचालक नादुरुस्त पर्यायी मार्गावरून आपली वाहने नेण्यास नकार देत असल्याने साखरोणे,वडशेत वावे,धारवली येथील ग्रामस्थांना बागमांडला मार्गे श्रीवर्धन येथे येणे म्हणजे खर्चिक व त्रासदायक ठरत आहे.