। पंढरपूर । प्रतिनिधी ।
लाखो वारकरी सांप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन आराखडा तयार करण्यात येणार आहे. तो आराखडा मंदीर समितीकडे 31 जुलै पर्यंत सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी निर्देश दिले.विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीकडून करण्यात येणार्या कामांबाबत तसेच पुरतत्व विभागाकडून तयार करण्यात येणार्या आराखड्याबाबत संत तुकाराम भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी हे निर्देश दिले.
उपसभापती गोर्हे म्हणाल्या, भारतीय पुरातत्व विभागाने तयार केलेला आराखडा मंदीर समितीला सादर केल्यानंतर मंदीर समितीने अधिकारी, इतिहासकार, संस्कृतचे अभ्यासक यांच्याशी चर्चा करुन मते जाणून घ्यावीत. आराखडा तयार झाल्यानंतर आपत्कालीन व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता याबाबत बैठका घेवून चर्चा करावी. गोर्हे यांनी श्री.संत नामदेव पायरी, चोखमेळा समाधी, दर्शन मंडप, स्काय वॉक, आमदार निधीतून बांधण्यात येणार्या इमारतीची पाहणी केली.यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीरांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार्या आराखड्याचे सादरीकरण व माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी यावेळी दिली. तसेच उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी पोलीस प्रशासनाचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत तर मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी नगरपालिकेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती दिली.
बैठकीस नगराध्यक्षा साधना भोसले, गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, दिलीप स्वामी, तेजस्वी सातपुते,अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, सचिन ढोले, विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,पुरातत्वा विभागाचे श्री.वाहने, सुशिल बेल्हेकर, अरविंद माळी, दत्तात्रय गावडे यांच्यासह मंदीर समितीचे सदस्य उपस्थित होते.