। धाटाव । वार्ताहर ।
सध्या सुरु असलेल्या राजकीय सत्तासंघर्षात आम्ही अपात्र होणार नाही, यासाठी फिल्डिंग लावून ठेवली असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रतोद आ.भरत गोगावले यांनी केला आहे. धनुष्यबाण सुद्धा आपलाच असेल असा इशाराही त्यांनी दिला. रोहे येथे आयोजित कऱण्यात आलेल्या गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गोगावेल यांनी गणपती सणादरम्यान हा रायगडचा मावळा मंत्रिमंडळात असेल, असा दावाही केला. मंत्रिमंडळ निवडीदरम्यानचे किस्से सांगत असताना ते पुढे म्हणाले की, आम्ही थोडा त्याग केला. पण पुढे चांगले होईल. यापुढे लोकांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद महत्वाची आहे. आपल्याला तेच एक मिशन ठेवायचे आहे. रोह्यात ज्यांची मक्तेदारी आहे, ती मोडीत काढू, असा इशाराही त्यांनी खा.सुनिल तटकरे यांना उल्लेख न करता दिला.
रोह्यातील 26 गाव पाणी योजनेसाठी तब्बल 40 कोटी रुपये शिंदे सरकारने मंजूर केले, तेही तटकरेंना खुपले असल्याची जहरी टीकाही त्यांनी केली. तुम्ही भूमिपूजनाला आलात. आता उद्घाटनाला बाकी तुम्ही येणार नाही, हे लक्षात ठेवा, असा मार्मिक टोलासुद्धा त्यांनी माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांना लगावला.