। नवीन पनवेल । वार्ताहर ।
दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात होणार्या गणेशोत्सवातील प्रसादावर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. विषबाधेच्या संभाव्य घटनांचा धोका टाळण्यासाठी प्रसाद तयार करताना आणि तो वाढताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकर पालन करण्याचे आवाहन एफडीएकडून गणेश मंडळांना करण्यात आले आहे.
प्रसादाच्या सेवनातून विषबाधा होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही वेळा भाविकांनी तयार करून आणलेल्या प्रसादाचे वाटप केले जाते. या प्रसादाबद्दल कार्यकर्त्यांना कोणतीच कल्पना नसते. दूषित प्रसादाच्या सेवनातून विषबाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळे दोन वर्षांनी उत्साहात होणार्या या गणेशोत्सवात वाटप होणारा प्रसाद सुरक्षित असेल, यासाठी एफडीएने भर दिला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी गणपती मंडळांनी स्वतः तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करण्याची सूचना केली आहे. तसेच प्रसादासाठी वापरला जाणारा शिधा व अन्य पदार्थांची गुणवत्ता तपासणे व प्रसाद करण्याच्या ठिकाणी स्वच्छता बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय तयार प्रसाद थंड आणि स्वच्छ जागेत ठेवावा, अशी विनंती मंडळांना करण्यात आली आहे.
काय काळजी घ्यावी
प्रसादासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या शिधा स्वीकारू नये. प्रसाद वाटपासाठी अनोळखी व्यक्तींवर अवलंबून राहू नये. खात्री करून नैवेद्य वाटावा. सणासुदीच्या काळात दुकानातून विकत आणला असेल तर तयार करण्याची जागा स्वच्छ आहे का, याची खात्री करून घ्यावी.