गुरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर; शेतकर्यांच्या चिंतेत वाढ
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मागील काही आठवड्यापासून धो-धो कोसळणार्या परतीच्या पावसाने अखेर रागडातील शेतकर्यांच्या पिकांचा घात केला. ऐन दिवाळीच्या आदल्यादिवशीच अचानक झालेल्या मुसळधार पावसाने झाल्याने बळीराजाची गेली वर्षभराची संपूर्ण मेहनत वाया गेली आहे. शेतात आलेली मोत्यासारखी कणसे व खरीपाचे पीक चिखलात गेले आहे. यामुळ गुरांच्या वैरणीचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. पावसाने रोहा तालुक्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पहाटे धुक, दुपारी मोठी उन्हाची झळाळी तर सायंकाळी अचानक होत असलेल्या पावसाने भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
सोन्यासारखे पीक वाया जात असल्याने शेतकरीही चिंताक्रांत झाला आहे. यावर्षी काही भात पिकासह तीळ, नाचणी, वरीची व हळदीच्या पिकांची लागवड केली होती. ते पीक देखील चांगल्या प्रकारे आली होती. काही विभागात ती देखील पीके कापणीस योग्य झालेली आहेत. मात्र गेली आठ दिवसांतून अधिक काळ परतीचा पाऊस कोसळत असल्याने त्या पिकांचे देखील मोट्या प्रमाणावर नुकसान होत आहेत.
रोहा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सरकारने रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष सुरेश मगर यांनी केली आहे.