तीन सरपंच तर चार ग्रामपंचायतींमध्ये बहुमत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्ष आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. आक्षी, मुळे आणि वैजाळी ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच चांगल्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत तर या तीन ग्रामपंचायतींसह नारंगी ग्रामपंचायतीत शेकापला बहुमत मिळाले असल्याने सहापैकी चार ग्रामपंचायतीत शेकाप आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची आज मतमोजणी अलिबाग तहसिलदार कार्यालयात पार पडली. आक्षी ग्रामपंचायतीमध्ये शेकाप काँग्रेस आघाडीच्या उमेदवार रश्मी रविंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवार पुजा महेश गुरव तसेच अपक्ष उमेदवार श्रेया श्रीकांत गुरव यांचा पराभव करीत विजय मिळवला.
रश्मी पाटील यांना 991 तर पुजा गुरव यांना 866 तसेच श्रेया गुरव यांना 93 मते मिळाली. शेकापक्षाच्या रश्मी अभिजीत वाळंज, आनंद दत्ताराम बुरांडे, नमु जाखा गडकर, कुंजल शिवनाथ पाटील, जाखा आल्या गडकर, विनायक विलास पाटील, निरजा निलेश नाईक हे शेकापक्षाचे सात उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. तर कुमार जनार्दन बानकर आणि धानी आल्या गडकर हे दोन उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभुत झाल्या. येथे समीर अनिल म्हात्रे आणि नेत्रा मोरश्वर पाटील हे निवडून आले.
मुळे ग्रामपंचायतीमध्ये देखील शेकाप आघाडीने शिंदे गटाला चितपट करीत ग्रामपंचायती आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुहानी संतोष पाटील यांनी शिंदे गटाच्या प्रतिक्षा प्रमोद थळे यांना पराभुत करीत ग्रामपंचायतीवर आघाडीचा झेंडा फडकवला. या ग्रामपंचायतीमध्ये शेकापक्षाचे कमळाकर सदानंद पाटील, चेतना मंगेश पाटील, श्रुती श्रीरंग थळे तसेच आघाडीचे प्रसाद अरुण थळे हे उमेदवार विजयी झाले. उर्वरित जागांवर तृप्ती किरण थळे, परेश तुळशीदास पाटील व अस्मिता समाधान पाटील हे विरोधी उमेदवार निवडून आले.
वैजाळी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या लढतीत शेकापक्ष शिवसेना आघाडीने बाजी मारत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. सरपंच पदाच्या उमेदवार शैला रविंद्र पाटील यांनी चौरंगी लढतीत सर्वाधिक 924 मते घेत 195 मतांनी शिंदे गटाच्या उमेदवार प्रशाली विनोद पाटील यांचा पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवार सरोज डाकी 333, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मृणाली प्रसाद पाटील 417 अशी मते पडली. या ग्रामपंचातीमध्ये शेकाप शिवसेना आघाडीच्या अरुणा सिद्धनाथ पाटीलख् अविनाश जनार्दन मोकल, सारीका रामराजा मोकल हे शेकापचे तर शर्वरी शैलेश ठाकूर आणि शालिनी प्रकाश मोकल या शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवार विजयी झाल्या. तसेच शिंदे गटाचे विजय बळीराम गावंड, सागर हनुमंत पाटील, अंकुर तुकाराम मोकल हे उमेदवार निवडून आले.
नारंगी ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा निसटता पराभव झाला असला तरी सर्वाधिक सदस्य हे शेकापक्षाचे निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर शेकापक्षाचे वर्चस्व कायम राहिले आहे. तर शिंदे गटाचे थेट सरपंचपदाचे उमेदवार उदय बाबू म्हात्रे हे निवडून आले आहेत. तसेच शेकापक्षाचे राजेंद्र गंगाधर म्हात्रे, राहुल सतिश पाटील, अमोल सुधीर पाटील, सविता अनिल धुमाळ यांनी चांगल्या फरकाने विजय मिळवला आहे. तसेच अनिता विजय पाटील, गुणवंत शैलेश पाटील, आणि केतन बाळकृष्ण म्हात्रे हे निवडून आले आहेत.
शिरवली ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदी शिंदे गटाचे प्रनिकेत रमाकांत म्हात्रे हे निवडून आले आहेत. तर शेकापक्षाचे निलीमा मनोज म्हात्रे, संदेश उद्धव म्हात्रे यांनी चांगल्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्याचप्रमाणे शुभम प्रदीप म्हात्रे, कल्पना अर्जुन माळी, ललिता संजय माळी, वैभव नंदकुमार माळी, प्रिती प्रमोद ठाकुर हे विरोधी उमेदवार निवडून आले आहेत.
बोरीस गुंजीस ग्रामपंचायतीमध्ये धनशक्तीच्या जोरावर शिंदे गटाने विजय मिळवला. सदिच्छा सुधीर पाटील यांनी काँग्रेसच्या अर्चना प्रविण म्हात्रे यांचा पराभव केला. तर सदस्यपदी धवळ दिलीप राऊत, सानिका संदीप म्हात्रे, रविंद्र जयराम बेर्डे, मोहिनी विलास वेंगुर्लेकर, हेमंत रविंद्र पडते, रेखा अवधुत म्हात्रे हे उमेदवार निवडून आले आहेत.
अलिबागचे तहसिलदार विशाल दौंडकर आणि निवासी नायब तहसिलदार अजित टोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.