आ. जयंत पाटील यांची मागणी
| नागपूर | दिलीप जाधव |
रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे 300 मच्छिमार बोटी असून, मुरुड किनारी अद्ययावत अशी लहान जेट्टी नसल्यामुळे मासे उतरवणे व मच्छिमारांना लागणार्या साहित्याची चढ-उतार करणे गैरसोयीचे व त्रासदायक होत आहे. त्यामुळे येथे अद्ययावत जेट्टी उभारा, अशी मागणी शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत मागणी केली.
जेट्टी नसल्यामुळे बोटींचा खालील भाग वाळूत अडकत असल्याने नुकसान होणे, बोटीत जाळी चढविणे, डिझेलचे ड्रम चढविणे, बर्फ नेण्याचे काम व मासे उतरविण्याचे काम हे चार फूट पाण्यात उतरून करणे आदी अडचणींचा सामना मच्छिमारांना आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी लावताना करावा लागत आहे.
मुरुड किनारी वाळूचा गाळ वाढल्याने ओहोटीच्या वेळी बोटी नेण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे किनार्यावरील गाळ काढणे आवश्यक असून, सदर ठिकाणी लहान जेट्टी बांधण्याची आवश्यकता आहे, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
यावर मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या दिलेल्या लेखी उत्तरात जयंत पाटील यांनी सांगितलेली वस्तुस्थिती मान्य केली. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मुरुड येथे मच्छिमार जेट्टी व मूलभूत सुविधांचे बांधकाम करणे या कामास 15 डिसेंबर 2011 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या कामामध्ये गाळ काढणे यासह इतर तीन बाबींचा समावेश होता. पत्तन विभागाने 28 फेबु्रवारी 2018 रोजी सदर काम पूर्ण केले असून, बंदरातील 1116 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे.
मुरुड किनार्याला वाळूचा गाळ वाढल्याने ओहोटीच्या वेळी बोटी समुद्रकिनारी नेण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि, मुरुड येथे जेट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन लहान जेट्टी न बांधता ग्रोईन्स बंधारा बांधणे आवश्यक आहे, असे मंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.