ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा आग्रह
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील वासरे खोंड्यात असलेले सांगवी हे गाव दरडग्रस्त गाव म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याची पाहणी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केली व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. ग्रामस्थांनी आमचे पुनर्वसन आमच्या गावाच्या परिसरातच करा, असा आग्रह धरला. पालकमंत्र्यांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांना गावाच्या पुनर्वसनासाठी लवकरात लवकर जागेची पाहणी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, खांडपे सरपंच नमिता घारे यांनी तटकरे यांचे स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद लाड, माजी सभापती तानाजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर, माजी सरपंच मधुकर घारे, भास्कर दिसले, बळीराम देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद देशमुख, प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी शेजारील दगडखाणीमुळे आम्हाला धोका आहे, असे सांगितले. त्यावेळी भगवान भोईर यांनी माझी खाण 5 जूनपासून बंद आहे. आमचे गाव यापेक्षा जवळ आहे, तेथे काहीच होत नाही, तरीही मी याबाबत चाचणी करण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले.
आमचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे आणि या परिसरातच व्हावे, अशी विनंती तटकरे यांच्याकडे केली. त्यानंतर गावाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने संपूर्ण पाहणी करून जागेचीही उपलब्धता पाहून अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूल अधिकार्यांना केल्या.