| आलिबाग । प्रतिनिधी |
आपल्या मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसापासून मुरुड तालूक्यातील शेतकऱ्यांनी जेएसडब्लू विरोधात उपोषण सुरू केले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती खालावली असून त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सामंजस्य कराराचे उल्लंघन करणाऱ्या जे.एस.डब्ल्यू कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्या या मागणीसाठी दि.12 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुरुड तालुक्यातील चेहेर, मिठेखार, वाघूळवाडी, नवीन चेहर, साळाव, निडी या गावातील शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांपैकी माधुरी मुंबईकर आणि जनार्दन रोटकर या दोघांची प्रकृती खालवल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून जे.एस.डब्ल्यू.ला सहकार्य करत असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केले आहे.