माजी खेळाडूचा मोठा दावा

रोहित सांभाळणार पुन्हा मुंबईची धुरा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला अद्याप सूर सापडेलला नाही. मुंबईला पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर राजस्थानविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा कर्णधार असताना मुंबईने अनेकदा कमबॅक केले आहे, पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात कमबॅक होईल का? याची चर्चा सुरु आहे.

रोहित शर्माला पुन्हा मुंबईचं कर्णधारपद देणार, आशा चर्चेला जोर धरला आहे. यामध्येच आता माजी खेळाडूच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे. राजस्थानविरोधातील सामन्यानंतर एका क्रिकेट कार्यक्रमात मनोज तिवारीने मुंबईच्या कर्णधारपदावर मोठा दावा केला. मनोज तिवारीच्या मते रोहित शर्माकडे पुन्हा एकदा मुंबईच्या संघाची धुरा जाऊ शकते. हार्दिक पांड्या आयपीएलच्या मध्यात रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवेल. कर्णधार बदलणं खूप मोठा निर्णय आहे. पण यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाला आहे. पण हार्दिक पांड्याचं नेतृत्वही तितकं खास दिसत नाही. हार्दिकच्या नेतृत्वातच गडबड दिसत आहे, असेही माजी क्रिकेटर मनोज तिवारी म्हणाला.

Exit mobile version