| रोहा । प्रतिनिधी ।
रासायनिक शेतीला पारंपारिक समजणे दिवसेंदिवस घातक ठरत आहे. रासायनिक किटकनाशके, खतांच्या वाढत्या प्रमाणाने मातीचा दर्जा खालावत आहे. नदी, नाले, समुद्र यांसह पूर्णतः पर्यावरण बिघडत आहे तसेच तापमानातही मोठी वाढ झाली आहे. हे वेळीच न थांबवल्यास जगाला धोका आहे. त्यासाठी आपल्या नैसर्गिक शेतीकडे वळा, कॅन्सर व अन्य भयानक आजारापासून दूर रहा, नैसर्गिक शेती करा, देशासह आपणही सुजलाम् सुफलाम्, सुदृढ होऊ या असे मौलिक आवाहन कृषी अभ्यासक माधुरी देशपांडे यांनी केले आहे. रोहा येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान व स्किल विकास फाउंडेशन आयोजित माती विज्ञान आणि नैसर्गिक फायदेशीर शेती विषयांवरील मार्गदर्शनावर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शेतकरी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, धनंजय जोशी, विनोद पाटील, दगडू बामुगडे, खेळू थिटे, उमेश पाटील, संतोष दिवकर, विजय दिवकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेती ही बहुतांश रासायनिक अनैसर्गिक घटकांनी होत आहे. यातून आपण निसर्ग, जैव चक्रावर अत्याचार करीत आहोत. रासायनिक खते, कीटकनाशके आरोग्य, माती सर्वच घटकांवर परिणाम करत आहोत. त्यामुळे शेती पद्धतीत वेळीच बदल करणे गरजेचे आहे असे सांगत देशपांडे यांनी डिजिटल माहितीद्वारे शेती काल आणि आजची समजावून सांगितली. भाजणी, गवत बाहेर फेकणे हे अज्ञानपणाचे आहे. तेच गवत गादी करावी, त्यावर जीवामृत टाकावे, त्यामुळे मातीचा दर्जा सुधारतो, गांडूळ तयार होतात. दुसरीकडे लाल मुंगी, खेकडा, वाळवी हेही आपले मित्रच आहेत. प्रत्येकजण आपापली कामे करतात अशी विविध गैरसमज दूर करून माधवी देशपांडे यांनी उपस्थित प्रगत शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान आपल्या पिढीला व पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायचे आहे. सुभाष पाळेकर यांच्या कृषी (SPK) तंत्रज्ञानावर करीत असलेल्या प्रयत्नाना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे शेतकरी तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत असे कृषी विचार व्यक्त झाले.