खोटया सह्या करणार्यांवर तात्काळ कारवाई करा; आ.जयंत पाटील यांचा प्रशासनाला इशारा
| पेण | संतोष पाटील |
डोलवी एमआयडीसी प्रकरणी मोजणीसाठी खोट्या स्वाक्षर्या करुन शेतकर्यांची फसवणूक करणार्यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा खरमरीत इशारा शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी पेण प्रांताधिकार्यांना दिला आहे.
डोलवी एमआयडीसी प्रकरणाने आता वेगळेच रूप धारण केले आहे. 11 गावातील जवळपास 98 टक्के शेतकर्यांनी एमआयडीसीला कडाडून विरोध केला आहे. हा विरोध शासनाच्या दरबारात नोंद केलेला असतानाच काही राजकीय मंडळी आणि दलालांनी शेतकर्यांच्या खोटया सह्या करून मोजणीसाठी आमची हरकत नाही. अशा आशयाचे पत्र प्रांतकार्यालयात दिल्याने खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार एमआयडीसी शेतकरी संघर्ष समितीने उघड आणला आहे. याचा जाब विचारण्यासाठी आ.जयंत पाटील यांनी सोमवारी ( 13 जून) पेण प्रांत कार्यालय गाठले आणि शेकाप स्टाईल प्रांतांसह प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सदरील बाबीचा गांभीर्याने विचार करून खोटया सहया करणार्यांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आ.रवी पाटील, माजी आ.धैर्यशील पाटील यावेळी उपस्थित होते.
या चर्चेत जयंत पाटील यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना खडसावून सांगितल की, वेळ आल्यास आम्ही आपल्या विरूध्ददेखील गुन्हा दाखल करायला मागे पुढे पाहणार नाही. कारण चुकीच्या पध्दतीने सह्या करणे हा फार मोठा गुन्हा आहे. आम्ही कुठेही राजकारण आणायला मागत नाही. हे जे आम्ही ठरवलेले आहे, ते आम्ही करणारच. एक इंचसुध्दा जागा आम्ही एमआयडीसीसाठी देणार नाही, असेही ते म्हणाले. आता मुळ मुद्यात तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, तुम्हाला दबाव कुणाच येतोय हे ही सांगणे गरजेचे आहे. कोण दबाव करतो त्यांची नावे सांगा शेतकरी ते बघून घेतील. सरपंच काय मालक आहे? मी आमदार आहे, रवी पाटील आमदार आहे, मग काय आम्ही मालक आहोत? का सर्व काय त्यांच्या मालकीच आहे. याच्यामध्ये तटकरे काय मालक आहेत? त्यामुळे ज्यांनी सहया केल्या आहेत त्यांच्या विरूध्द गुन्हे नोंद झालेच पाहिजेत अशी मागणी करतानाच पोलीस अधिकार्यांना कसली व्हेरीफाय करायला सांगताय?, हे काम महसूल खात्यांनी करणे गरजेचे आहे.असा सवालही त्यांनी लागोपाठ उपस्थित केले. येत्या अधिवेशनाला हा मुद्दा भवनात मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी माजी आ.धैर्यशील पाटील यांनीही फसवणूक शेतकर्यांची नसून शासनाची आहे. खोटया सह्या करुन मारून जर शासनाची दिशाभूल करत असतील तर ते चुकीचे आहे. त्याची दखल शासनाने घ्यायलाच हवी, अशी मागणी प्रांतांकडे केली.
यावेळी संतप्त शेतकर्यांनीही चुकीच्या सहया मारणार्यांना शासन झालेच पाहिजे अशी एकमुखी मागणी प्रांताधिकार्यांकडे केली. प्रांताधिकार्यांनी देखील सदरील प्रकाराचा तपास तातडीने करून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले. डोलवी एमआयडीसी साठी एकूण 2168 एकर जमिन संपादीत करण्याचे शासनाने उद्दिष्ट ठेवले होता. यामध्ये 11 गावांचा समावेश होता. परंतु शेतकर्यांचा विरोध लक्षात घेउन शासनाने काढता पाय घेत खारजांभेला, खारढोंभी, खारचिरबी, वावे, व कोलवे या दोन गावातील काही भाग वगळला आहे. मात्र काही दलालांनी आयडीयाची कल्पना लढवून जोशी, देव, डोंगरे, शर्मा, अग्रवाल, अशा प्रकारे आडनावे असणार्या व्यक्तींच्या खोटया सहया मारून मोजणीसाठी हरकत नसल्याचे पत्र दिले आहे. ज्या 22 शेतकर्यांच्या नावाने अर्ज दिला आहे. त्यातील चौकशी केल्यावर 6 शेतकर्यांच्या सहयाच बोगस असून या 6 जणांनी कायदेशीर दाद देखील मागितली आहे.
प्रातं कार्यालय येथे झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर (हरिओम) म्हात्रे, डी.बी.पाटील, समाजसेवक अरुण शिवकर, गुरूनाथ मांजरेकर, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, मा.जिल्हा परिषद सदस्य संजय जांभळे, संजय डंगर, परशूराम म्हात्रे, स्वप्निल म्हात्रे, दिलीप पाटील, काशिनाथ पाटील, एमआयडीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी हजर होते.
गेली 25 वर्ष विधीमंडळामध्ये घालविली. तिथे कायदे कसे बनतात याची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे कुणी चौकशी करायची आणि कुणी चौकशी करू नये हे आम्हाला सांगू नये. त्यामुळे खोटया सह्या करणार्यांवर कारवाई करा एवढीच आमची मागणी आहे.
आ.जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस