शेवळा, कुलू, भारंग, कर्टोलीसह राजभाज्यांचाही जेवणात समावेश
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या आठवडाभर अधूनमधून विश्रांती घेत पडणार्या पावसामुळे हळूहळू सृष्टीने हिरवाई ल्याली असताना मोकळया माळावर आळंबी उगविण्यास सुरूवात झाली असल्याचे दिसून येत आहे. वारकरीबहुल तालुक्यात या आळंबीची भाजी साधारणपणे मांसमच्छीप्रमाणे रस्सा आणि मसालेदार कालवण बनवून पावसाळ्यातील शेतीकामात ऊर्जा मिळविण्यासाठ शेतकरीवर्गाकडून उपयुक्त ठरविली जात आहे. अन्य रानभाज्यांचा वापरदेखील जेवणामध्ये वाढला आहे.
पावसाळयाच्या पहिल्या पंधरा दिवसांत अतिशय छोट्या कोवळ्या आकारात उगवणारी आळंबीची भूछत्रं 20-25 दिवसांनी अगदी तळहाताच्या रूंदीएवढी फोफावतात आणि अतिशय चविष्ट होतात. पेरा हातभर झाल्यानंतर आवणं बांधताना तसेच शेत नांगरताना आळंबी उगवायच्या माळरानातील जागेवरही सहज नजर ठेवून असलेले शेतकरी शेत नांगरून झाल्यानंतर लावणीपूर्वी ही आळंबी खुडून घराकडे नेतात आणि लावणीदरम्यान या आळंबीची रस्साभाजी किंवा मसालेदार कालवण भाकरीवर घेऊन खातात. शेतातील कष्टामुळे निर्माण झालेली क्षुधाशांती करण्याची पध्दत अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसून येत असते. काही शेतकर्यांकडे शेवळा ही पावसाळ्यातील रानभाजीदेखील मांसाहारी पद्धतीने बनविण्याची प्रथा आहे.
पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यातील रानभाज्यांनाही सुरूवात झाली असून, टाकळा, कुरडू, कुलू, दिंडा, भारंग, मायाळू, आघाडा अशा पालेभाज्या व कर्टोली ही फळभाजी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजच्या जेवणामध्ये खाण्यास सुरूवात झाली असून, आळंबी आणि शेवळ्यासाठी खवय्यांची विशेष पसंती दिसून येत आहे.