। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात दख्खन ते कळकदारा दरम्यान दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या या भागातील एकेरी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे महामार्गावरील वाहनांचा वेग मंदावला आहे. या परिसरात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून, सध्या पावसाचा जोरही वाढताना दिसत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी अत्यंत सावधगिरी बाळगून आणि वाहनांचा वेग मर्यादित ठेवूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






