| मुंबई | प्रतिनिधी |
महेंद्रसिंग धोनीनं 2011 साली वानखेडे स्टेडियमवरच्या विश्वचषक अंतिम सामन्यात ठोकलेल्या निर्णायक षटकाराची आठवण कायमस्वरुपी जतन करून ठेवण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी ही घोषणा केली.
धोनीच्या त्या विजयी षटकारानंतर चेंडू वानखेडे स्टेडियमच्या विठ्ठल दिवेचा स्टँडमध्ये जिथं पडला, त्या खुर्च्यांच्या ठिकाणी धोनीच्या नावानं भारताच्या विश्वचषक विजयाचा स्मृतिफलक किंवा स्मृतिस्तंभ उभारण्यात येईल. आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमधला सामना शनिवार, आठ एप्रिल रोजी खेळवण्यात येईल. त्या सामन्यानिमित्तानं एमसीएच्या वतीनं धोनीचा वानखेडे स्टेडियममधल्या त्याच ऐतिहासिक जागेवर सन्मान करण्यात येईल, अशी माहिती अमोल काळे यांनी दिली.
8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी धोनी मुंबईत येणार आहे. त्यावेळी स्मारकाचे उद्घाटन करण्याची योजना आहे. धोनी यासाठी होकार देईल अशी एमसीएला आशा आहे. स्मारकाच्या उद्घाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही, कारण ती पूर्णपणे धोनीच्या संमती आणि उपलब्धतेवर अवलंबून असेल. वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक विजय स्मारकाचे उद्घाटन करताना एमसीए धोनीचा सत्कार करणार आहे, असेही काळे यांनी सांगितले.