| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्य शासनाने मदतीचा मोठा आव आणत आनंद शिधा पोहचवण्याचा खटाटोप व्यर्थच ठरला आहे. ऐन दिवाळीत देखील जिल्ह्यातील अवघ्या अलिबाग, मुरुड, पनवेल, पेण, रोहा, उरण या सहाच तालुक्यात आनंदाचा शिधा पोहोचला आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा गोरगरिबांसाठी दुःखाचाच शिधा ठरल्याने संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
जिल्ह्यात आता पर्यंत 11 हजार 590 आज पर्यंत इतक्याच लाभार्थ्यांना या शिधा संचाचे वाटप पूर्ण झाले आहे. अलिबाग, मुरुड, पनवेल, पेण, रोहा, उरण, या सहाच तालुक्यात आनंदाचा शिधा पोहोचला आहे. दरम्यान, आनंदाचा शिधा ऑफलाइन वितरित करण्यासाठी जिल्हा कार्यालयाने परवानगी दिली आहे. आनंद शिधेचा आनंद दिवाळी सुरू होऊनही उरणच्या जनतेला मिळालेला नाही. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर याचा उपयोग काय असा सवाल जनता करीत आहे.
राज्य सरकारने 100 रुपयात जनतेची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. ही योजना जाहीर होण्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे, ही शिधा जनतेपर्यंत पोहोचवणे शक्य नाही. केवळ 20 टक्के धान्य जिल्ह्याच्या गोदामात पोहोचले आहे. त्यातही एक चार पैकी दोन धान्य पोहोचले नसल्याने चार धान्याचे किट पॅक करण्याचे काम थांबले आहे, तर या चारही वस्तू ज्या बॅगेत पॅक करायच्या आहेत, त्या बॅगदेखील पोहोचल्या नाहीत हे पाहता फक्त दोन वस्तूंचे पॅकिंग करायचे कसे ? असा प्रश्न गोडावून कीपर आणि वितरण कर्मचाऱ्यांना पडला आहे.
राज्य सरकारला या दिवाळी भेटीत एक कोटी पासष्ट लाख लाभार्थ्यांना 100 रुपयात चणाडाळ, रवा, साखर आणि पामतेल अशा चार वस्तू प्रत्येकी एक किलो देण्याचं निर्णय झाला. त्यानुसार जिल्ह्यात काही तालुक्यात फक्त तेल व डाळ या दोनच वस्तू आले आहेत. इतर दोन वस्तू आलेल्या नाहीत. त्यामुळे आलेल्या डाळ व तेल य वस्तूंचे वाटप केले असल्याचे दुकानदार सांगतात. मग इतर दोन वस्तूं गेल्या कुठे अशी चर्चा सुरू आहे.
प्रत्यक्षात सर्व वस्तूंचे पॅकेजेस काही तालुक्यांच्या फक्त गोडावून मध्ये आले आहेत. मात्र त्याचे वितरण अजूनही झालेले नाही. त्यामुळे या आंनद शिधा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय वाटपात सुरू असलेल्या घोळावरून दिसत आहे. तरी याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.