भारतीय युवा संघाचे दमदार पुनरागमन !

नेपाळवर दणदणीत मात; उपांत्य फेरीची दिशा स्पष्ट!


| दुबई | वृत्तसंस्था |

आशियाई क्रिकेट परिषद 19 वर्षाखालील आशिया कपचा 10 वा सामना 12 डिसेंबरला भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. दुबईतील आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी मैदान क्रमांक 2 वर दोन्ही संघ आमनेसामने आले. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात टीम इंडियाने नेपाळला एकतर्फी 10 गडी राखून पराभूत करून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. हा विजय मिळवून देण्यात राज लिंबानीच्या घातक गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार उदय सहारनने नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला आणि नेपाळचा संपूर्ण संघ 52 धावांत गडगडला. टीम इंडियाने नेपाळने दिलेले 53 धावांचे लक्ष्य गाठले आणि 7.1 षटकात बिनबाद 57 धावा केल्या. सलामीवीर अर्शीन कुलकर्णीने 30 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 43 धावा केल्या तर आदर्श सिंग 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा करून नाबाद परतला.

नेपाळला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचे 3 सामन्यांत 2 विजयांसह 4 गुण झाले आहेत. भारताची धावगतीची सरासरीही 1.856 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाचेही 4 गुण आहेत, मात्र धावगतीमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्ध तो शेवटचा सामना खेळणार आहे. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर येईल आणि भारत-पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

विजयाचा हिरो ठरला राज लिंबानी
या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज राज लिंबानी टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला होता. राज लिंबानीने 1.41 च्या इकॉनॉमीसह 9.1 षटकात केवळ 13 धावा दिल्या आणि 7 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यान राज लिंबानीने 3 निर्धाव षटकेही टाकली.

Exit mobile version