| पुणे | वृत्तसंस्था।
पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत. त्यात अनेक ठिकाणी किरकोळ कारणावरुन कोयते हल्ले करुन हत्या करण्याच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. शरद मोहोळांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यातील कोथरुड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोथरुड परिसरात चार ते पाच जणांच्या कोयता गॅंगच्या टोळीने कोयत्याने वार करत 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात केली आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी (दि.16) मध्यरात्री एका तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कोथरुड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीनिवास हा रात्री त्याच्या मित्रासोबत घरी निघाला होता. कर्वे नगर परिसरातील गांधी चौकात पाच सहा जणांच्या टोळीने त्याला आणि त्याच्या मित्राला अडवले आणि त्यांच्यावर जोरदार वार करायला सुरुवात केली.
हा सगळा प्रकार पाहून श्रीनिवासचा मित्र पळून गेला. श्रीनिवासवर एवढे जोरदार वार करण्यात आले की तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. काही आजूबाजूच्या लोकांनी श्रीनिवासला पाहून त्यांची मदत केली आणि त्याला जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच श्रीनिवासचा जीव गेला होता. याबाबत अलंकार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रीच्यावेळी हल्ला केल्याने संशय व्यक्त केला जात आहे. हा हल्ला नेमका कशामुळे केला असावा, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.