कर्जतमध्ये पावसाळापूर्व कामांना वेग

जेसीबी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने नालेसफाई
महिनाअखेर सर्व कामे पूर्ण करण्याची न.प.ची ग्वाही

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत शहरात असलेल्या 30 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई पावसाळापूर्व कामांमध्ये केली जात आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील उपनाल्यांची सफाई जवळपास पूर्ण झाली असून, मुख्य नाल्यांची सफाई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरु आहे. दरम्यान, जेसीबी मशीन आणि कंत्राटी कामगार यांच्या सहाय्याने नालेसफाई सुरु असून, या महिन्यात सर्व नाले साफ झालेले असतील, अशी माहिती कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली आहे.


कर्जत नगरपरिषद क्षेत्रातून उल्हास नदी वाहत असून, पावसाळ्यात होणार्‍या अतिवृष्टीच्या काळात शहरातील काही भागात पावसाचे पाणी शिरत असते. जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरामध्ये उल्हास नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसले होते. त्यात पूर येऊन दहीवली, इंदिरानगर बामचामळा, मुद्रे गुरुनगर तसेच कर्जत कोतवालनगर भागात पुराचे पाणी शिरुन काही कुटुंबांचे नुकसान झाले होते. त्यामुळे सन 2022 चे पावसाळ्यांत संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत. नगर परिषद क्षेत्रात पावसाचे पाणी साठून काही हानी होऊ नये यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व नाले आणि गटारांची पावसाळ्यापूर्वी जेसीबीद्वारे व कामगारांद्वारे साफसफाईचे काम पालिकेने हाती घेतले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.


कर्जत शहरात 6 मुख्य नाले व 20 इतर छोटे-मोठे नाले गटारे (अंदाजे लांबी 30 कि.मी.) असून, या गटारांचे पावसाळ्यापूर्वी साफसफाईचे काम हाती घेतले असून, आतापर्यंत नगर परिषदेचे जेसीबीद्वारे व कर्मचार्‍यांकडून 70 टक्के काम पूर्ण करण्यात आले असून, 25 मेपर्यंत सर्व नाले व गटारांचे साफ सफाईचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यात नालेसफाई करताना शहरातील सर्व सार्वजनिक जागांची सफाई करुन घेण्यात येत आहे. नगर परिषद क्षेत्रात दैनदिन जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्यात साथीचे रोग पसरु नये यासाठी उपाययोजना म्हणून जंतूनाशक फवारणीकामी नगर परिषदेने आवश्यक जंतुनाशकांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात येणार आहे.

कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये असलेल्या मुख्य आणि पोटनाले यांच्या सफाईची कामे सुरु आहेत. शहरातील सहा किलोमीटर लांबीच्या मुख्य नाल्यामध्ये जेसीबी मशीनच्या, तर लहान नाल्यांमध्ये नालेसफाई केली जात आहे. 30 किलोमीटरच्या एकूण नाल्यांतील गाळ, उगवलेली झाडे काढून नाला गाळ-कचरामुक्त करण्याचा प्रयत्न आहे.

सुरेखा भणगे, प्रभारी मुख्याधिकारी
Exit mobile version