अन्य तालुकाध्यक्ष आदर्श घेतील का?
| पेण | प्रतिनिधी |
शिवसेना (उबाठा) गटाचे तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर यांच्या पॅनलला तरणखोप ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत ठाकूर यांनी आपल्या तालुकाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. प्रसार माध्यमांसमोर बोलताना जगदीश ठाकूर यांनी सांगितले की, राजकारणात काही अलिखित नियम असतात ते पाळणे गरजेचे आहे. माझ्या ग्रामपंचायतीमध्ये माझ्या पॅनलचा पराभव झाला. या पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून आज मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही.
जगदीश ठाकूर यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून पदाचा राजीनामा दिला. अशाच प्रकारे नैतिक जबाबदारी म्हणून भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयानंद भगत हे राजीनामा देतील का, अशीही चर्चा सध्या पेणमध्ये ऐकायला मिळत आहे. एकंदरीत, राजकीय मंडळीने स्वतःची नैतिकता समजून पराजयाचे खापर इतरांवर फोडण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. वाशी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा सरपंचपदाचा उमेदवार पराभव झाला. यामध्ये तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या ओढांगी गावातूनच मतदान कमी झाल्याचे आकडेवारीनुसार समोर आले. मग ही जबाबदारी मतदारांची की अध्यक्षांची हेही ओळखणे गरजेचे आहे. तर खारपाडा ग्रामपंचायतीमध्ये 781 मतांनी तालुकाध्यक्ष दयानंद भगत यांच्या पत्नी रश्मी भगत यांचा पराभव झाला याची जबाबदारी दयानंद भगत घेतील का आणि राजीनामा देतील का, असाही प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. एकंदरीत, जगदीश ठाकूर यांचा आदर्श सर्वांनी घेऊन नैतिकतेच्या आधारे आपला पदाचा राजीनामा देण्यास हरकत नाही.