14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रायगडचा हिंगोलीवर विजय

नाशिक विरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित, अमेय पाटीलचे पाच बळी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षाखालील मुलांच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड संघाने आपल्या गटातील पहिल्या सामन्यामध्ये हिंगोली विरुद्ध विजय विजय मिळवून सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले. नाशिक विरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित राहिला.
हिंगोली विरुद्धचा सामना महात्मा नगर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.या सामन्यात हिंगोली संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 97 धावा केल्या. रायगडच्या अमेय पाटील याने 12 षटकात 17 धावा देऊन 5 बळी घेतले. त्याला साईराज जोशी याने आठ षटकात 22 धावात 2 बळी व कप्तान ओम म्हात्रे याने 4 षटकात 26 धावात 3 बळी घेऊन मोलाची साथ दिली. रायगड संघाने आपल्या पहिल्या डावात 214 धावा केल्या.आघाडीचे फलंदाज विनोद भोईर 77 चेंडूत 40 धावा व क्रिश भाईरा 83 चेंडूत 61 धावा यांनी 24.1 षटकांमध्ये 100 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. हिंगोली संघ दुसर्‍या डावात 129 धावात गारद झाला. या डावात देखील रायगडच्या अमेय पाटील याने पुन्हा 14.1 षटकात 33 धावांत 5 बळी घेतले व संपूर्ण सामन्यात 10 बळी घेण्याची किमया केली. त्याला दुसर्‍या बाजूने 31 धावांत 3 बळी घेऊन साईराज जोशीने चांगली साथ दिली. रायगड संघाने आपल्या दुसर्‍या डावात लक्ष 5.2 षटकांमध्ये 13 धावा करून विजय मिळवला. सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले.
रायगडाचा गटातील दुसरा सामना नाशिक विरुद्ध झाला. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये रायगड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला व आपल्या द्रुतगती गोलंदाजांनी पहिल्या 5.1 षटकांमध्ये 2 बळी मिळवत कप्तानाचा हा निर्णय सार्थ ठरवला. परंतु नंतर नाशिकच्या फलंदाजांनी शंभर धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर मात्र ठरावीक अंतराने रायगडच्या गोलंदाजांनी बळी मिळवत नाशिकचा पहिला डाव 228 धावांमध्ये संपवला. रायगडच्या शौर्य गायकवाड याने सतरा षटकांमध्ये 44 धावा देऊन सर्वाधिक 5 बळी घेतले व त्याला अमेय पाटील व साईराज जोशी यांनी प्रत्येकी 2 बळी घेत सुंदर साथ दिली. नंतर फलंदाजी करताना रायगडच्या पार्थ पवार 20 धावा व क्रिश बहिरा 79 यांनी 57 धावांची भागीदारी नोंदवत चांगली सुरुवात करून दिली. तिसर्‍या विकेट करता 33 धावांची भागीदारी करताना क्रिश पाटील याने 28 चेंडूत 26 धावा केल्या. पाचव्या विकेट करता पुन्हा क्रिश बहिरा व कप्तान व म्हात्रे यांनी 30.1 षटकांमध्ये 68 धावांची भागीदारी नोंदवली. सहाव्या विकेट करता कप्तान ओम म्हात्रे व निलेय सावंत यांनी 7.2 षटकांमध्ये 22 धावांची भागीदारी केली. तेव्हा रायगडचा धावफलक 78.5 षटकांत 6 बाद 191 असा होता. पुढे ठराविक अंतराने रायगडचे फलंदाज बाद होत गेल्याने रायगड संघाचा धावफलक नऊ बाद 212 असा झाला. त्यानंतर शेवटच्या गड्या करता स्मित पाटील नाबाद 11 धावा व साईराज जोशी नाबाद 7 धावा यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत उर्वरित 5.1 षटकांमध्ये 16 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या असताना दोघांनी तीन धावा पळून काढल्या त्यामुळे संघाचा धावफलक 9 बाद 228 असा झाला व सामना बरोबरीत सुटला. नाशिक विरुद्ध हिंगोली व रायगड विरुद्ध औरंगाबाद या लढातींच्या निकालावर पुढील सुपर लीग फेरी करीता कोण पात्र ठरणार हे निश्‍चित होईल.

Exit mobile version