राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
फिल्ड आर्चरी असो. ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे फिल्ड आर्चरी असो. ऑफ रायगड यांच्या यजमानपदाखाली 14 व्या महाराष्ट्र राज्य फिल्ड इनडोअर धनुर्विद्या निवड चाचणी स्पर्धा अलिबागेतील जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील चौदा धनुर्धरांची निवड राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे 14 आणि 15 डिसेंबर या दोन दिवसांत देशाचे उज्वल भविष्य असणार्या धनुर्धरांचे अचूक वेध पहायला मिळाले. यावेळी, एकास एक सर्रास कामगिरी करणारे धनुर्धर जवळून पाहण्याचा अनुभव रायगडकरांना आला. शिस्तबद्धता, एकाग्रता आणि संयमाचे समीकरण असणारी हि स्पर्धा रायगडकरांसाठी पर्वणी ठरली. दरम्यान, या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ दत्ताजीराव खानविलकर ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 14 धनुर्धरांची निवड राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी करण्यात आली असून लखनौ येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या धनुर्धरांना फिल्ड आर्चरी असो. महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम चव्हाण, महासचिव सुभाषचंद्र नायर, उपाध्यक्ष रितिका नायर, रायगडचे सचिव संतोष जाधव, मिलिंद पांचाळ, वैभव सागवेकर, अजिंक्य अडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
रायगडच्या 14 धनुर्धरांची निवड
रायगड जिल्ह्यातील 14 धनुर्धरांची निवड राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. यामध्ये दहा वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये रुधिरा जाधव, स्वाहा कदम, क्षितिका कदम, मुलांमध्ये अर्जुन म्हात्रे आणि अभिमन्यू मिश्रा या पाच धनुर्धरांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले तिकीट पक्के केले आहे. 14 वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये तनिषा वर्तक, मुग्धा वैद्य, सई पिळणकर तर मुलांमध्ये आशय आंग्रे, दिव्यनिल दत्ता, अंश पराडकर, आरव हुलवान आणि अथर्व पाटील या धनुर्धरांनी प्रतिस्पर्ध्यांना मात देत पदकाला गवसणी घातली आहे. वरिष्ठ वयोगटात लाभेश तेली या धनुर्धराने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर अचूक नेमबाजीने मात केली.