| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसह केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील चैत्यभूमी येथे सोमवारी (दि.20) आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा प्रकार मुंबईत घडला.
या कारवाईत पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख साम्या कोरडे आणि शेकापचे मुंबईतील नेते राजेंद्र कोरडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हे निदर्शन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतल्याचा प्रकार घडल्याने शेतकरी कामगार पक्षासह विद्यार्थ्यांनीही तीव्र निषेध व्यक्त केला.
साम्या कोरडे यांच्या सांगण्यानूसार, शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईचा पक्षाने तीव्र निषेध नोंदविला असून, विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पोलिसी बळाने रोखता येणार नाही, अशी भूमिका व्यक्त केली आहे. आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणीही यावेळी साम्या कोरडे यांनी केली.
महाराष्ट्र सरकारने आंदोलकांची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा आवाज मांडायचा होता. ही मुंबईतील विद्यार्थ्यांची भावना होती. नीट पेपर फुटीचे प्रकरणासह अन्य समस्यांविरोधात विद्यार्थी एकत्र आले.परंतु विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काबाबत भाजप प्रणित सरकाराला काहीही पडलेले नाही, हे दिसून आले आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
साम्या कोरडे – अध्यक्ष
पुरोगामी विद्यार्थी संघटना, शेकाप
