| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
कृषी विद्यापीठ खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असेल तर दुर्गम भागात प्रदर्शने व मेळावे घेतल्यास विद्यापिठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत सहज पोहोचवणे शक्य होईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करत असताना त्याला विद्यापिठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. विविध पिकांच्या जातींचा वापर करून शेती म्हणजे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहावे. विशेषतः एकात्मिक शेतीच्या माध्यमातून शेती केल्यास गावामध्येच उत्पन्नाची साधने उपलब्ध होणे सहज शक्य आहे. शेती या व्यवसायाला दुसरा पर्याय नसून हा निरंतर चालणारा व्यवसाय असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, घरडा फाउंडेशन आणि घरडा केमिकल्सतर्फे संयुक्त विद्यमाने अनसपुरे (खेड) येथे मंडळस्तरीय शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन झाले. त्या वेळी डॉ. भावे बोलत होते. अणसपुरे मालपवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात मेळाव्याचे आयोजन व विद्यापिठाचे प्रदर्शनीय दालन उभे करण्यात आले होते. काजू व आंबा या पिकांवर रोग व्यवस्थापनासाठीचे फवारणीचे प्रात्यक्षिक आणि आंबा पुनरूज्जीवनाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मेळाव्याला कृषी विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी सहाय्यक अविनाश निकम यांचा सत्कार कुलगुरू व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शेतीक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध पुरस्कारप्राप्त शेतकरी भगिनी व शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ व विद्यापीठाची दैनंदिनी व भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. मेळाव्याला पंचक्रोशीतील 250 हून अधिक महिला आणि पुरुष शेतकरी उपस्थित होते. या वेळी विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप, सरपंच संतोष मालप, माजी पंचायत समिती सदस्या समिक्षा जाधव, पंचक्रोशी गावातील विविध सरपंच, घरडा केमिकल्सचे तुषार हळदवणेकर, तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी आदी उपस्थित होते.