सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध
अखेरच्या दिवशी विकासकामांचा धडाका
। अलिबाग । भारत रांजणकर ।
रायगड जिल्ह्याच्या विकासाचे प्रमुख केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेवर सोमवारी(21 मार्च) प्रशासकीय राजवट लागू होणार आहे.त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. विद्यमान जिल्हा परिषदेची मुदत रविवारी 20 मार्चला संपुष्टात आली.अखेरच्या दिवशी जिल्ह्यात जि.प.च्या माध्यमातून विकासकामांचा जोरात प्रारंभ करण्यात आल्याचे दिसून आले.
विद्यमान जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सलग पाच वर्षे सत्ता आहे.पहिल्या अडीच वर्षासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडे अध्यक्षपद होते तर उर्वरित अडीच वर्षासाठी शेकापच्या योगिता पारधी यांनी यशस्वीपणे जिल्हा परिषदेचा कारभार हाताळला.संपूर्ण पाच वर्षात दोन महिलांनी शिवतीर्थावरुन जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न केला.विद्यमान जिल्हा परिषदेत शेकापचे 23, राष्ट्रवादी 12, शिवसेना 18, काँग्रेस 3, भाजप 3 असे सदस्य संख्या बळ आहे. मावळत्या सभागृहाची एकूण सदस्य संख्या 59 अशी होती.