रेशनिंगच्या तांदळात प्लास्टिक तांदूळाची भेसळ?

गोरगरीब नागरिकांचे आरोग्य धोक्यात

| खोपोली | प्रतिनिधी |

सरकार कडून कोरोना काळापासून उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक कुटुंबाला धान्य पुरवठा करण्याची तरतूद केलेली आजतागायत सुरू आहे. हे धान्य नक्की चांगल्या दर्जाचे आहेत का, ही तपासणी आतापर्यत कोणी केली का, हा प्रश्न समोर येत आहे. सध्या परिस्थितीत रेशनिंग दुकानामार्फत मिळणारे तांदुळ पाण्यात स्वच्छ करताना पाण्यावर काही तांदूळ तरंगत असल्याचे निदर्शनास येताना दिसत आहेत. तसेच, हे तांदूळ काही वेळ भिजून नंतर ते नरम न होता कठीणच असल्याचे समोर आल्याने यात प्लास्टिक असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या बाबत नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली असून यावर चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

शासनाकडून मोफत धान्य पुरवठा योजना सुरू आहे, यात तांदूळ सह जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे. मात्र, यात मिळणाऱ्या वस्तूचा दर्जा योग्य आहे का, असा प्रश्न आता पडू लागला आहे. महिनाभराचे धान्य घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून ठेवल्यास योग्य प्रकारे ठेवता येतात. यासाठी सावरोलीमध्ये रेशनिंग दुकांवरील मिळालेले तांदूळ पाण्यात स्वच्छ करून ठेवत असताना या तांदूळ मधील काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे समोर आले आहे. बराच वेळ झाल्यावर हे तांदुळ नरम झाले आहेत का, त्याची हाताने चुरा करण्याचा प्रयोग केला असता हे तांदूळ न फूटता हातातून निसटत असल्याचे समोर आल्याने या तांदलांमध्ये प्लास्टिक तांदूळ असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे येथील महिलांनी पोटात प्लास्टिक जात असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे याबाबत खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी पुरवठा शाखेमार्फत तपासणीचे आदेश देऊन या होणाऱ्या फसवणुकीपासून गोरगरीब जनतेला योग्य दर्जाचे धान्य द्यावेत, अशी मागणी सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे आता पुरवठा शाखा विभाग काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पाण्यात भिजत ठेवलेले तांदूळ काही वेळाने नरम होत असतात. मात्र, रेशनिंग दुकानातून आणलेले तांदळापैंकी काही तांदूळ चक्क पाण्यावर तरंगत होते, त्यामुळे आश्चर्य वाटले. मात्र, तेच तांदूळ हातावर घेऊन चुरा करण्याचा प्रयत्न केला असता तांदूळ हातातून सटकत होते. त्यामुळे या तांदळात भेसळ असल्याचे समोर आले. त्यामुळे मनात काहीशी भीती वाटली. या मोफत मिळणाऱ्या तांदळाची चौकशी करून कार्यवाही व्हावी, नाहीतर शासनाची गरीब कुटुंबांना मदत आरोग्याला हानिकार ठरेल.

आशा खोपकर,
सामाजिक कार्यकर्त्या खालापूर
Exit mobile version