| अलिबाग | प्रतिनिधी |
दैनिक महासागर या वृत्तपत्राकडून रोहा येथे रायगड जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये उमटे धरण संघर्ष समितीचे ॲड. राकेश पाटील यांना ‘समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मागील कित्येक वर्षांपासून अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे येथील 33 आदिवासी वाड्या व 47 गावांची तहान भागविते. परंतु, या धरणात साठलेल्या गाळामुळे पाणीसाठा कमी होत असल्याने एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. तसेच, धरणातील अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येऊ लागले आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नावर मागील 12 वर्षांपासून उमटे धरण संघर्ष समितीचे अँड. राकेश पाटील हे आवाज उठवत आहेत आणि त्याची दखल घेण्यासाठी देखील शासनाला भाग पाडले आहे. त्याचबरोबर ॲड. राकेश पाटील यांनी अलिबाग-रोहा रस्त्याच्या दुरवस्थेाबाबत देखील प्रशासनाला नेहमीच धारेवर धरले आहे.
तसेच आदिवासी, आगरी व कोळी समाज बांधवासाठी अलिबाग, रोहा, मुरुड, उरण कोर्टात नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे वकील म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत. ॲड. राकेश पाटील यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून शासनाच्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या घोटाळ्याच्या विरोधात कोर्टात जाऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडले होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. नारायण नागू पाटील यांच्या शेतकरी संपावर ‘कसेल त्याचीच जमीन’ या नैसर्गिक न्यायाच्या कुलकायदा या विषयावर समग्र लिखाण आणि उत्कृष्ट व्याख्याते म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. त्याचबरोर त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेच्या कामातला भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. अनेक मोठ्या धमक्या आणि प्रलोभनांना कधीही ते बळी पडले नाहीत. यासह ॲड. राकेश पाटील यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक व पत्रकार संस्थांचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. अनेक दैनिक वृत्तपत्रांमध्ये चालू घडामोडींवर लेख लिहित आहेत. त्यामुळे ॲड. राकेश पाटील यांच्या या कार्यांचा सन्मान म्हणून दैनिक महासागर वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना ‘समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला मान्यवर म्हणून दैनिक महासागरचे संपादक व मालक श्रीकृष्ण चांडक, माजी आमदार अनिकेत तटकरे, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मंदार दोंदे, रमेश धनावडे, कुमार थत्ते, राजेश मापरा आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
दैनिक महासागर वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आभारी आहे. उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न नेहमीच उचलून धरणाऱ्या अलिबागसह संपुर्ण रायगड जिल्ह्यातील पत्रकार, संपादक तसेच सामाजिक संस्था व राजकीय नेते यांचाही मी ऋणी आहे. कारण त्यांच्यामुळेच मी आज या पुरस्कारापर्यंत पोहचलो आहे. या पुरस्कारामुळे मला नवी ऊर्जा मिळून एक वेगळी जबाबदारी मिळाली आहे.
ॲड. राकेश पाटील,
उमटे धरण संघर्ष समिती







