प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मोहीम; मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण

जिल्ह्यातील 2,603 पैकी 2,012 शाळा डिजिटल

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात तसेच विविध प्रयोगांतून शिक्षण घेता यावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही मोहीम येत आहे. या मोहिमेंतर्गत शाळा डिजिटल मोबाईल करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या दोन हजार 603 शाळांपैकी 2 हजार 12 शाळा डिजिटल झाल्या असून, उर्वरित 591 शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. या शाळाही टप्प्या-टप्प्याने पूर्ण डिजिटल करण्याचा मानस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी व्यक्त केला आहे.

प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भावी आयुष्याचा पाया असल्याने येथे मिळणारे शिक्षणही आधुनिकतेला धरून असणे अत्यावश्यक आहे. त्यातच खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्यामुळे डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थही प्रयत्न आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकही यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक शाळा सध्या डिजिटल बनल्या आहेत. शाळांतील विद्यार्थी स्मार्ट फोनच्या माध्यमातून गृहपाठ, अध्ययन करत आहेत.

रायगड जिल्ह्यात 2 हजार 603 शाळा असून, सध्या 2 हजार शाळा डिजिटल आहेत, तर उर्वरित 591 शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. या शाळाही डिजिटल करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी जिल्ह्यातील लहान-मोठे उद्योजक, सामाजिक संस्थां यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सामाजिक उत्तरदायित्वातून डिजिटल शाळांसाठी त्यांनी मदत करीत. गावागावातील शाळा डिजिटल केल्या आहेत.

नवोपक्रमामुळे पटसंख्येत सुधार
मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विविध नवोपक्रम राबविले जात आहे. अनेक शाळांमध्ये एलईडी, एलसीडी, संगणक, टॅब, मोबाईल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शिवाय, अध्यापनाच्या नवनवीन पद्धतीही विकसित केल्या जात आहेत. यामुळे खासगी शाळांतील विद्यार्थी जि.प. शाळांकडे आकर्षित असून, पटसंख्येत सुधारणा झाली आहे.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण होत आहे. डिजिटल शाळाव्यतिरिक्त शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न आहे.

डॉ. किरण पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप
Exit mobile version