पंजाबातील एका खलिस्तानवाद्याला पकडण्यासाठी ऐशी हजार पोलिस आणि इतर यंत्रणा तैनात व्हाव्यात आणि तो तब्बल चार दिवस सापडू नये ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणामुळे खलिस्तानवादी संघटना पुन्हा डोके वर काढत आहेत की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अमृतपालसिंग असं त्याचं नाव आहे. वारिस पंजाब दे या संघटनेचा तो नेता असून ही संघटना उघडपणे खलिस्तानवादी घोषणा देत असते. बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे 23 फेब्रुवारीला लव्हप्रीत तूफान नावाच्या एका गुंडाला पोलिसांनी एका अपहरणाच्या प्रकरणात अटक केली होती. त्याची सुटका करण्यासाठी या संघटनेचे हजारो कार्यकर्ते हातात तलवारी आणि इतर शस्त्रे घेऊन अजनाला पोलिस ठाण्यात घुसले. त्यांनी प्रचंड तोडफोड केली. हे उघड उघड सरकारविरुद्धचे बंड होते. दुर्दैवाने पोलिसांनीही त्यांच्यापुढे शरणागती पत्करली. दुसर्या दिवशी लव्हप्रीत याच्याविरुध्द कोणताही पुरावा नसल्याचा जबाब न्यायालयापुढे देऊन त्याला सोडून देण्यात आले. पंजाबात आम आदमी पक्षाच्या भगवंतसिंग मान यांचे सरकार आहे. मान हे अगदीच अननुभवी आहेत. शिवाय, राजकीय परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोणत्याही गोष्टीचा फायदा उठवायला भाजपवाले टपलेले आहेतच. गेल्या निवडणुकीच्या प्रचारात पंजाब हे सुरक्षेच्या दृष्टीने नाजूक राज्य असल्याचे पंतप्रधानांनी वारंवार म्हटले होते. आता त्याच मुदद्यावर आपला घेरण्यासाठी भाजपला एक मुद्दा मिळाला आहे. दरम्यान मान यांनीही अनावश्यक शौर्य दाखवण्याचा प्रयत्न केला. अजनालाच्या हल्ल्यानंतर, राज्यातील अशा हजारभर असंतुष्ट लोकांच्या कारवायांना किंमत देण्याची गरज नाही असे ते म्हणाले. पण त्यानंतर केंद्राकडे मदत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली. आता तर अमृतपालला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे मारले जात आहेत. मध्यंतरी एक दिवस अफवा रोखण्यासाठी पंजाबातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. पंजाबसारख्या प्रगत आणि श्रीमंत राज्यावर ही पाळी यावी हे गंभीर आहे.
शिखांमधील असंतोष
अमृतपालला पाकिस्तानची फूस असावी असा संशय आहे. पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. राजकीय नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी चालू आहे. विरोधी पक्षनेता इम्रानखानला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे परत जावे लागले. अशा स्थितीत लोकांचे लक्ष वळवण्यासाठी तेथील लष्कर पंजाबमध्ये पुन्हा कारवाया वाढवू शकते. मात्र त्याला एक मर्यादितच अर्थ आहे. अगदी अरब देशसुध्दा ज्याला भीक द्यायला तयार नाहीत असा पाकिस्तान पंजाबला फार रसद पुरवण्याची शक्यता नाही. खलिस्तानवादाला खरे बळ पंजाबातील असंतुष्ट शीख समुदायातून मिळण्याचाच धोका आहे. असा असंतोष असलेल्यांचे एकूण लोकसंख्येत प्रमाण सध्या नगण्य आहे. पण 1980 च्या दशकातही आरंभीच्या छोट्या असंतोषातून मोठा विस्फोट झाला होता हे लक्षात ठेवायला हवे. दुसरे म्हणजे शीख समाज जगभर पसरलेला असून कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमधून अशा फुटीर प्रवृत्तींना पाठिंबा आणि पैसा मिळत असतो. अमृतपाल प्रकरणानंतर याच तीन देशांमध्ये तेथील खलिस्तानवाद्यांनी आंदोलने केली व भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील तिरंगा हटवण्याचा प्रयत्न केला. शिखांचे स्वतंत्र राष्ट्र अर्थात खलिस्तान या मागणीला सैद्धान्तिक आधार पुरवण्याचे कामही या देशांमधून होत असते. 1980 च्या दशकात याच रीतीने पंजाब प्रश्न चिघळला होता. तेव्हा भिन्द्रनवाले नावाच्या माथेफिरूने देशाच्या गळ्यालाच नख लावण्याचा प्रयत्न केला. अकाली दल हा तिथला प्रादेशिक पक्ष. त्याला खच्ची करण्यासाठी इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे पंजाबातले नेते झैलसिंग यांनी आधी या भिंद्रनवालेला पाठीशी घातले, असा आरोप होतो. हा खोडून काढणारेही अनेक आहेत. गळ्यात काडतुसांची माळ घालून बंदूक घेतलेल्या अवस्थेत तो सर्वत्र फिरत असे. शीख राष्ट्राच्या निर्मितीसाठी भारत सरकारविरुद्ध सशस्त्र बंड करणे आवश्यक आहे असा त्याचा स्पष्ट संदेश होता. त्याचाच भाग म्हणून अमृतसरच्या सुवर्णमंदिर त्याने कबजात घेतले व तिथून तो आपल्या सर्व हिंसक कारवाया करू लागला.
कारवाई आणि सबुरी
इंदिरा गांधींनी सुवर्णमंदिरावर कारवाई केल्यानंतर पंजाब शांत होत गेला आणि नंतर त्यापायी त्यांचा खूनही झाला. पण म्हणून खलिस्तानचे हे भूत पूर्णपणे गाडले गेलेले नाही. भिन्द्रनवाले याने शीख धर्माच्या रक्षणासाठी मरण पत्करले असे अनेकांचे मत आजही कायम आहे. त्याचा उल्लेख कडवे शीख संत म्हणून करतात. शिखांच्या सर्वोच्च धार्मिक संस्थेने 2003 मध्ये त्याला अधिकृतरीत्या हुतात्मा म्हणून घोषित केले. सुवर्णमंदिरात आणि शीख इतिहासाच्या संग्रहालयात भिन्द्रनवाले आणि त्याच्यासोबतच्या फुटीर दहशतवाद्यांना शूर योद्धे म्हणून दर्शवले जात असते. विशेष म्हणजे काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष यावर बोलण्याचे वा टीका करण्याचे टाळतात. सुदर्शन हे सरसंघचालक असताना तर त्यांनी या परिसराला भेट देऊन सुवर्णमंदिरावरील कारवाई चुकीची असल्याचे म्हटले होते. आजचे भाजपचे नेतेही अशा कडव्या शिखांना चुचकारण्याचाच प्रयत्न करतात. खलिस्तानवादी अतिरेक्यांनी त्या काळात हजारो हिंदूंना ठार मारले आणि त्यांची लढाई भारतापासून फुटून निघण्याची आहे हे सत्य आपल्या राजकीय फायद्यासाठी दडवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अधिक भयानक परिणाम होतील हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवायला हवे. एकेकाळी जालंदरमध्येच काही हिंदूंची हत्या करून भिन्द्रनवालेने एकेकाळी दहशत निर्माण केली होती. त्याला तत्कालीन सरकारने अटकही केली होती. पण लोकमताचा दबाव म्हणा आणि राजकीय गणिते यामुळे त्याची सुटका झाली. आज अमृतपालच्या निमित्ताने इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. याच जालंदरमध्ये अमृतपालचा आणि त्याच्या संघटनेचा प्रभाव आहे. मात्र सरकारने कोणत्याही स्थितीत तो वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. त्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने राजकारण बाजूला ठेवून आणि पंजाब पोलिसांना मदतीला घेऊन योग्य ती कारवाई करायला हवी. एकीकडे पोलिसी इलाजासोबतच पंजाबातील अस्वस्थ तरुणांनाही साद घालायला हवी. गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनात खलिस्तानी असल्याचा आरोप भाजपने केला होता. तशी चूक पुन्हा होता कामा नये.