। अलिबाग । वार्ताहर ।
शेतकर्यांचा आधुनिक शेती करण्याकडे कल वाढत असताना डिझेलसारख्या इंधनाच्या दरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे यंत्राद्वारेही शेती करणे कठीण झाले आहे. बैलजोडीच्या किमती लाखो रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. मजुरी, डिझेल व खतांचा वाढता खर्च पाहता शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी व खर्च जास्त होत असल्याने शेतकर्यांना मेहनत करूनही तोटा सहन करावा लागत आहे. शेती आता नकोशी झाली असून, इतर फळ पिकांची लागवड करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्याला भातशेतीचे कोठार समजले जायचे, परंतु सद्यस्थितीत शेतीचे काम करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरीही अव्वाच्या सव्वा झाल्याने अशी कामे करून घेणे परवडत नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून मशागतीच्या कामासाठी सध्या ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. डिझेलच्या दरात अतोनात वाढ झाल्यामुळे यंत्राद्वारेदेखील शेती करणे कठीण जात आहे. त्यामुळे शेतकरी आता पर्यायी पिकांची लागवड करीत आहेत.
नवनवीन पिकांची लागवड
पूर्वी बैलाच्या माध्यमातून शेती केली जात होती. त्यात बदल होऊन वेळेची बचत व्हावी म्हणून ट्रॅक्टरद्वारे शेती केली जाऊ लागली; मात्र यंत्राद्वारे शेती करताना इंधनाचे दर, मजुरी, तसेच महागडी जंतुनाशके औषधे, खते आदींच्या किमती शेती व्यवसायाला परवडण्यासारख्या नाहीत. तसेच पावसाचा अनियमितपणा, वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून शेती करणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे आंबा, शेवगा, यांसारख्या पिकांची लागवड करण्याकडे शेतकर्यांचा कल दिसत आहेत.